जामखेड न्युज——
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी पालक मंत्र्यांना निवेदन – जिल्हा बँक संचालक अमोल जगन्नाथ राळेभात

शासनाने कर्जमाफी करण्यासाठी समिती गठीत केली असून समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी होणार असल्याचे समजते. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ व महात्मा जोतिराम फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या दोन्ही कर्जमाफीवेळी थकीत कर्जदार व नियमित कर्ज परतफेड करणारे सभासद यांच्यात भेदभाव करून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहन म्हणून तुटपुंजी रक्कम देण्यात आलेली होती.
जामखेड तालुक्यामध्ये साधारणत: १०३९८ शेतकऱ्यांकडे ९९ कोटी ९५ लाख थकबाकी असून ११३४१ नियमितपणे कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत. नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांपैकी अनेक शेतकरी हे उसनवारी घेऊन, सोनं गहाण ठेवून व इतर मार्गाने काहीतरी उलाढाल करून दरवर्षी मार्चपूर्वी नियमितपणे कर्जाचा भरणा करत आहेत.

परंतु शासन दरवेळेस कर्जमाफी करताना अत्यंत तुटपुंजी रक्कम प्रोत्साहन म्हणून देत आहे. यामुळे नियमितपणे कर्जाचा भरणा करणारे शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात नाराजी वाढत असून नियमित कर्ज भरावे कि नाही असा नाराजीचा सूर त्यांच्याकडून व्यक्त होत असल्याची भावना अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे यावर्षी अतिवृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे शासनाने थकीत कर्जदार व नियमित कर्जदार शेतकरी असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्यासाठी सरसकट कर्जमाफी/प्रोत्साहन योजना जाहीर करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी
अशी मागणी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांनी निवेदनाद्वारे केली आहे.







