तीन दिवसांपासून बांधून ठेवलेल्या दोन गायींची पांडुराजे भोसले यांनी केली सुटका
गेली तीन दिवसांपासून बैल बाजार परिसरात बांधून ठेवलेल्या दोन गाईची पांडूराजे भोसले यांनी सुटका केली आहे. पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. या गायींची रवानगी गोशाळेत करण्यात येणार आहे. बाजार समितीने दक्षता घेण्याची केली मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने कायदा करूनही गाई व गोवंश यांचा होणारा छळ थांबतांना दिसत नाही. गोवंश व गाईची होणारी तस्करी व छळ थांबवण्यासाठी धाऊन येणारे जामखेड येथील गोरक्षक असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुराजे भोसले यांना आज दि १६ जून रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जनावरांचा बाजार जेथे भरतो त्याठिकाणी येथे दोन गाई बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
या गाईंना गेली तीन दिवस चारा पानी न देता उन्ह पावसात उघड्यावर बांधुन ठेवुन वेदना देण्याचे काम अज्ञात आरोपींनी केले आहे. या अगोदर ही याच ठिकाणी अनेक गोवंश डांबून ठेवलेल्या अवस्थेत आढळलेले आहेत.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने दखल घेणे गरजेचे असल्याचेही पांडूराजे भोसले यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच जामखेड पोलीसांकडून याबाबत गुन्हा नोंद करण्यात येत असून यानंतर या गाईंना गो शाळेत सोडण्यात येईल असे पोलीस काॅन्स्टेबल वाघ व देशमाने यांनी सांगितले.
जामखेड येथील आठवडा बाजार येथून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी केली जाते. अनेक ठिकाणी जामखेड येथुनच मोठ्या प्रमाणात गोवंश पोहच केले जाते. यावर प्रशासनाने लक्ष ठेवून कारवाई करणे गरजेचे आहे.
शहरामध्ये नगरपरिषदेच्या हद्दीत खुलेआम गोवंश कत्तलखाने चालुच आहेत. ते बंद झाले पाहिजेत अशीही मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका प्रमुख पांडुराजे मधुकर भोसले यांनी केली आहे.