पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजात जागरुकता वाढली असून, अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत विवाह समारंभांसाठी एक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या संहितेनुसार हुंडा घेणे-देणे, डीजे लावणे, आणि प्री-वेडिंग शूट्स यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय समित्या स्थापन करण्यात येणार आहे व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
बैठकीचे आयोजन एन. बी. धुमाळ फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. हभप बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस मराठा समाजातील अनेक प्रतिष्ठित नेते, संस्था प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीनंतर तनपुरे महाराजांनी सांगितले की, समाजातील अनिष्ट प्रथा मोडण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून बदल करावा. आचारसंहिता योग्य प्रकारे राबवण्यासाठी तालुकास्तरावर समित्या तयार करण्यात येणार आहेत.
डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितले की, विवाह विषयक जनजागृतीसाठी कीर्तनकार आणि प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा. तर चंद्रकांत गाडे यांनी सांगितले की, विवाहाच्या वेळी मुलींकडून खूप अटी आल्यामुळे अनेक मुलांचे विवाह लांबणीवर पडतात, त्यामुळे पालकांनीही अपेक्षा कमी करायला हव्यात.
लग्न सोहळा शंभर ते दोनशे लोकांमध्ये केला जावा, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंताचा वापर करावा, प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. प्री-वेडिंग केलेले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केल्यास समाजाने त्यावर बहिष्कार टाकावा, कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे. नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये, कर्ज काढून लग्नात खर्च करू नये, मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा. लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत.
लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. लग्नात हुंडा देऊ, घेऊ नये. खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी. पैशासाठी सुनेचा छळ करू नये. जेवणात पाचपेक्षा जास्त पदार्थ नकोत, लग्न विधीला मान्यवरांचे आशीर्वाद बंद करावेत. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी. लग्नात दोन्ही बाजूने बस्ता व मानपान ज्याचे त्याने करावे. मराठा समाजासाठी सुचवलेली आचारसंहिता लग्न समारंभात वाचून दाखवावी. जिथे शक्य आहे तिथे नवरा नवरीचे हस्ते पाच झाडे लावावीत. लग्न, साखरपुडा आणि हळद एकाच दिवशी पार पाडावेत. दशक्रिया आणि तेराव्याच्या कार्यक्रमांत भोजनावळ बंद करावी.प्रत्येक तालुक्यात कार्यकारणी नेमून जास्तीत जास्त सामूहिक विवाह घडवून आणावेत, अशी आचारसंहिता आहे.
समाजाने अनिष्ट रुढींना तिलांजली द्यावी, समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा. सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभ आचारसंहितेची अंमलबजाणी करावी, त्यासाठी तालुकावर समिती स्थापन करण्यात यावी, अशी सूचना ही तनपुरे महाराज यांनी केली आहे. त्यानुसार या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी अकरा जणांची सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लग्नसोहळ्यात लग्न सोहळ्याच्या आचारसंहितेची जनजागृती घेण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकारांची पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी केलंय. प्रास्ताविक उद्योजक एन. बी. धुमाळ यांनी केले. तर प्रा. दशरथ खोसे यांनी आभार मानले.