जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील टाकलेल्या खडीमुळे दगड लागून शालेय विद्यार्थी गंभीर जखमी
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत अठरा महिन्यांची असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्ता कुठे खोदून ठेवलेला तर कुठे टाकलेला मुरूम, कुठे खडी तसेच सलग काम न करता कामात धरसोड, हवा तेवढा रस्ता उकरलेला नाही. अर्धवट रस्ता, कुठे गटाराचे काम पूर्ण तर कुठे गटारच नाही. शहरात खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक अनेक दिवसांपासून रस्ता अपुर्ण आहे यातच बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक येथे खडी टाकून ठेवलेली आहे. वाहनाच्या टायरखाली येऊन दगड उडून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तर अनेक वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत.
बीड काँर्नर वर यश शहादेव वराट रस्त्याच्या कडेने चालत असताना वाहनाच्या टायर खडीचा दगड उडून यशच्या डोळ्याजवळ लागला थोडक्यात डोळा बचावला डोळ्याखाली चांगली जखम झाली आहे. लवकरात लवकर रस्ता पुर्ण व्हावा अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.
रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग, खडी व मुरूम यामुळे निर्माण होणारी धुळ यामुळे नागरिक व व्यापारी हैराण तसेच काही ठिकाणी रस्त्यावर खाचखळगे यामुळे गाड्या व माणसाचे मनके खिळखिळे तसेच खडीचे दगडावर अनेक गाड्या घसरतात. तसेच मोठे वाहने वेगात ये जा करतात यामुळे दगड उडून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच अस्ताव्यस्त लावलेली वाहने यामुळे यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात रुग्णवाहिका ही अडकतात.
मागे काही महिन्यापूर्वी शहरामध्ये प्रशासनाने कारवाई करताना दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. गोरगरीबांना रस्त्यावरून ऊठ तर धनदांडग्यांना दिलेली सूट पाहता संताप व्यक्त केला आहे. या वेळेस लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एक दिलाने काम करून ‘उद्याच्या भविष्यातील जामखेड’ होण्यासाठी सरसकट अतिक्रमण मुक्त जामखेड करावे अपेक्षा सुजन नागरिक करत आहे.लवकरात लवकर अतिक्रमण हटवून सुसज्ज रस्ता बनवावा अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये आहे.
अनेक दिवसांपासून रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक रस्ता सुरू झाला होता. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, व्यापारी, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत महिन्यापुर्वी बैठक संपन्न झाली होती यावेळी अतिक्रमणे काढण्यात येणार याबाबत एकमत झाले होते. एक महिना झाला तरी अतिक्रमण हटाव मोहिम सुरु झाली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
अडिच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिन्याची मुदत असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम झाले नाही. आगोदर विधानसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी गप्प राहिले आता परत नगरपरिषद निवडणूक होणार म्हणून परत लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत. एरवी विकास कामाच्या बाबतीत श्रेयवाद उफाळून येतो मीच आणले म्हणून प्रेसनोट येतात. यामुळे वेळेत नियमानुसार रस्ता होण्यासाठी, विधान परिषदेचे सभापती, खासदार, आमदार यांनी गप्प दिसत आहेत.
जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अतिक्रमणे निघाली पण जामखेड शहरातील अतिक्रमणे निघत नाहीत नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे. जामखेड शहरातील जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्याने गोरगरीबांची दुकाने व टपर्या पुर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.
मात्र बीड रोडवरील धनदांडग्यांचे अतिक्रमण न काढताच व रस्ता रुंदीकरण न करताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. गरीब टपरी धारकांनी आपले अतिक्रमण काढून घेतले मात्र प्रशासनाने बीडरोडवरील ‘त्या’ दुकानांच्या अतिक्रमला पाठींबा दिला का ? असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे सामान्यकडून प्रशासनाच्या चलढकलपणा भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
जास्त टिका झाल्यानंतर एक महिन्यापुर्वी महामार्ग पदाधिकारी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या समवेत बैठक होऊन आठ दिवसात अतिक्रमण काढण्यावर एकमत झाले होते. पण एक महिना झाला तरी अद्याप कसलीही गती नाही.
चौकट उपमुख्यमंत्री अजित पवार जामखेड येथील कार्यक्रमात दरम्यान आले असता रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग बाबत अनेक तक्रारी ऐकून काम का रखडले, अतिक्रमणे का निघत नाहीत, नेमकी काय अडचण आहे. याचा खुलासा ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी करावा असे सांगितले होते वेळप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन लावू असेही सांगितले होते. आता कधी अतिक्रमणे निघणार, रस्ता कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.