जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला अनेक जीव गेल्यानंतर उशिरा सुचलेले शहाणपण
अपघात स्थळी सिग्नल, दिशादर्शक फलक, रेडियम
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत अठरा महिन्यांची असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्ता कुठे खोदून ठेवलेला तर कुठे टाकलेला मुरूम, कुठे खडी तसेच सलग काम न करता कामात धरसोड, यामुळे नागरिकांना होणारा त्रास, तसेच सिमेंट रस्त्यावर दिशादर्शक फलक नसणे, काम सुरू वाहने सावकाश चालवा फलक नसणे, रेडियम नसणे, यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुठेही कसलाही फलक नसल्याने अनेक बळी गेले ठेकेदारावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उडाली यानंतर महामार्ग ठेकेदाराला उशीरा शहाणपण सुचले आहे. आता अपघात स्थळी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, रेडियम तसेच सिग्नल बसवले आहेत.
मागे काही महिन्यापूर्वी शहरामध्ये प्रशासनाने कारवाई करताना दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. गोरगरीबांना रस्त्यावरून ऊठ तर धनदांडग्यांना दिलेली सूट पाहता संताप व्यक्त केला आहे. या वेळेस लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एक दिलाने काम करून ‘उद्याच्या भविष्यातील जामखेड’ होण्यासाठी सरसकट अतिक्रमण मुक्त जामखेड करावे अपेक्षा सुजन नागरिक करत आहे.लवकरात लवकर अतिक्रमण हटवून सुसज्ज रस्ता बनवावा अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये आहे.
अनेक दिवसांपासून रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक रस्ता सुरू झाला होता. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, व्यापारी, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत नुकतीच सभा संपन्न झाली यात अतिक्रमणे काढण्यात येणार याबाबत एकमत झाले होते. काम सुरू झाले होते पण राॅयल्टी न भरल्यामुळे चार दिवसांपासून शहरातील काम बंद आहे. राॅयल्टी भरण्यासाठी चार दिवस लागतात तर ठेकेदार रस्ता काम कसे करणार अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
काम सुरू झाले रस्ता खोदला मुरूम खडी टाकली पण राॅयल्टी थकल्याने महसूल विभागाने काम बंद केले. नेमका शहरातील रस्ता अनेक ठिकाणी खोदलेला, काही ठिकाणी मुरूम खडी ढिगारे, एकेरी वाहतूक व्यापाऱ्यांच्या दारात खडी व मुरूम ढिगारे, खोदलेला रस्ता यामुळे सगळीकडे धुळ यामुळे शहरातील बीड रोडवरील व्यापारी वर्ग तसेच नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही दुकाने कशी चालवायची असा प्रश्न केला होता. ठेकेदारांने राॅयल्टी का भरलेली नाही, नेमके महसूल विभागाला शहरात अडचणीच्या ठिकाणी काम असताना राॅयल्टीचे सूचले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाकडे एकुण 72 लाख रुपयांची राॅयल्टी होत आहे यापैकी 31 लाख रुपये भरलेले आहेत. बाकी शिल्लक आहेत. पाच दिवसांपूर्वीच भरतो म्हटलेल्या ठेकेदारांने का भरलेली नाही शहरवासीयांना व व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. लवकरात लवकर अतिक्रमण हटवून नियमानुसार रस्ता बनवावा असे नागरिकांना वाटत आहे.
अडिच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिन्याची मुदत असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम झाले नाही. आगोदर विधानसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी गप्प राहिले आता परत नगरपरिषद निवडणूक होणार म्हणून परत लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत. एरवी विकास कामाच्या बाबतीत श्रेयवाद उफाळून येतो मीच आणले म्हणून प्रेसनोट येतात. यामुळे वेळेत नियमानुसार रस्ता होण्यासाठी, विधानपरिषदेचे सभापती, खासदार, आमदार यांनीगप्प दिसत आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अतिक्रमणे निघाली पण जामखेड शहरातील अतिक्रमणे निघत नाहीत नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे. जामखेड शहरातील जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्याने गोरगरीबांची दुकाने व टपर्या पुर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.
मात्र बीड रोडवरील धनदांडग्यांचे अतिक्रमण न काढताच व रस्ता रुंदीकरण न करताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. गरीब टपरी धारकांनी आपले अतिक्रमण काढून घेतले मात्र प्रशासनाने बीडरोडवरील ‘त्या’ दुकानांच्या अतिक्रमला पाठींबा दिला का ? असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे सामान्यकडून प्रशासनाच्या चलढकलपणा भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जास्त टिका झाल्यानंतर नुकतीच महामार्ग पदाधिकारी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या समवेत बैठक होऊन आठ दिवसात अतिक्रमण काढण्यावर एकमत होणार होते. नेमके गुरूवार पासून काम बंद आहे. आज काम सुरू होण्याची शक्यता आहे.
चौकट
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – पांडुरंग माने
अर्धवट व अपुऱ्या कामामुळे तसेच नियमानुसार काम नसल्याने रस्त्यावर रेडियम, दिशादर्शक फलक, सूचना फलक नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्व चूक ठेकेदाराची आहे त्यामुळे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी केली आहे.
चौकट काम दर्जेदार व नियमानुसार व लवकरात लवकर व्हावे – तुषार बोथरा
राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार आहे तेवढा रस्ता लवकरात लवकर व दर्जेदार करावा, ज्यांची अतिक्रमणे असतील ते काढावीत आगोदर गटारे करावीत मग रस्ता लवकरात लवकर दर्जेदार करावा अशी मागणी भाजपा युवा नेते तुषार बोथरा यांनी केली आहे.