Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची शाहुपुरीत एकत्र पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची शाहुपुरीत एकत्र पाहणी

0
341
जामखेड न्युज – – – 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पुरग्रस्त कोल्हापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते कोल्हापुरच्या पुरग्रस्त अशा शाहुपुरीची पहाणी करत असताना एकमेकांसमोर आले, दोघेही भेटले, आणि बोललेही. राज्यातले दोन टॉपचे नेते असे अचानक भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस कळालं की, फडणवीसही त्याच भागात पहाणी करतायत, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना शाहुपुरीतच थांबण्याचा निरोप दिला. हवं तर वेगवेगळी पहाणी करण्यापेक्षा, एकत्र पहाणी करु असा आग्रही ठाकरेंनी धरला. त्यानंतर फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत, ते शाहुपुरीतच थांबले आणि दोघांची भेट अशा पद्धतीनं झाल्याचं कळतंय.
फडणवीसांनी काय सांगितलं मुख्यमंत्र्यांना?
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची ही काही मिनिटांचीच भेट उभ्या उभ्या झाली. ह्या भेटीच्यावेळेस फडणवीसांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते तर मुख्यमंत्र्यांसोबत सेनेचे स्थानिक आमदार, मंत्री मुश्रिफही होते. दोन नेत्यांची जी उभ्या उभी भेट झाली त्यात नेमकं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं याची सर्वांना उत्सुकता लागली. नंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी त्याचा खुलासा केला. ते म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलवली तर आम्ही त्या बैठकीला हजर राहु असं मी त्यांना कळवलं.
नार्वेकरांकडून फडणवीसांना निरोप
मुख्यमंत्री आणि फडणवीसांची एकमेकांसोबत भेट झाली. ही भेट ठरवूनच झाल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याने फडणवीस थांबले आणि दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आजच्या आजच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. अवघ्या काही मिनिटाच्या या भेटीनंतर फडणवीस जायला निघाले. तेव्हा मिलिंद नार्वेकरांनी गर्दीतून त्यांना वाट मोकळी करून दिली. मिलिंद नार्वेकर हे फडणवीसांना त्यांना सोडवायला गेले होते. नार्वेकरांनी फडणवीसांची ही आवभगत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजप आणि शिवसेना जवळ येण्याच्या तर या हालचाली नाहीत ना?, अशी चर्चाही रंगली आहे.
घाबरू नका, काळजी करू नका
मुख्यमंत्र्यांनी शाहुपुरीत पूरबाधितांशी आत्मियतेने संवाद साधला. घाबरू नका , काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्री पूरग्रस्तांना देत होते. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहोत. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू, असंही त्यांनी सांगितलं. पूजा नाईकनवरे या स्थानिक रहिवाशी महिलेनी या आपत्कालीन स्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले. तर गणेश पाटील या स्थानिक रहिवाश्याने यंदा 2005 व 2019 पेक्षाही सध्या भयंकर पूर आल्याचं सांगितलं. तसेच शासनाने भरीव मदत करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!