जामखेड न्युज – – – – –
शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना लगावला. शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तेही हळूहळू डरकाळी फोडतील असं राऊत म्हणाले.
नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून शिवसेना खासदार संजय राऊत व मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आॅक्सिजन प्लाॅटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, भगवान फुलसौंदर, जामखेड तालुकाप्रमुख संजय काशिद सह अनेक तालुकाप्रमुख सरपंच उपसरपंच शिवसैनिक हजर होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असं सांगितलं. शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसैनिक कधीच माजी होत नाही
संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठंही जा लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, असंही ते म्हणाले. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे वाईल्ड फोटोग्राफर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाईल्ड फोटोग्राफर आहेत. ते वाघ आणि सिंहाचे फोटो काढतात. इतर प्राण्यांचे नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
शिवसेनेचा झेंडा तोपर्यंत पुन्हा पुन्हा येईल
यावेळी त्यांनी फडणवीसांवर नाव न घेता टीका केली. मी पुन्हा येईल …मी पुन्हा पुन्हा येईल… जोपर्यंत शिवसेनेचा झेंडा तोपर्यंत पुन्हा पुन्हा येईल…, असा फडणवीसांना टोला लगावतानाच दिल्लीच्या तक्तावरही भगवा फडकवू. हारलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत. तिच खरी बाळासाहेबांना मानवंदना राहील, असं ते म्हणाले.










