Home ताज्या बातम्या पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

0
3

जामखेड न्युज – – – – – 

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केलेल्या सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकांना ओलाव्याअभावी फटका बसत असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
जामखेड परिसरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.त्यामुळे उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी तातडीने समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली असून पाऊस लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. कृषी विभागानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक मार्गदर्शन करावे आणि नुकसान झाल्यास शासनाने योग्य मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी कर्ज काढून, महागडे बियाणे व खते खरेदी करून पेरणी पूर्ण केली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती. परंतु त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. सध्या शेतातील पिके पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

पावसाअभावी तालुक्यातील नदी, नाले आणि ओढे कोरडे पडले असून अनेक ठिकाणी विहिरींनीही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.

सध्या आषाढी वारीचा उत्साह राज्यभर सुरू असताना जामखेड तालुक्यातील बळीराजा मात्र पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांकडे आशेने पाहत आहे. “पांडुरंगा, चांगला पाऊस पाड आणि आमची शेती वाचव” अशी साकडे शेतकरी घालत असून सर्वांचे लक्ष आता येणाऱ्या काही दिवसांतील पावसाकडे लागले आहे. दरम्यान, कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यास काही प्रमाणात परिस्थिती सुधारू शकते. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगामावर मोठे संकट ओढवून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!