बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी आज परभणीत मोर्चा काढण्यात आला आहे. या सर्वपक्षीय मोर्चामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला आहे.
‘करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी’ :
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मात्र आकाला वाचवण्याचा प्रयत्न आकाच्या आकाने केला तर ते गेलेच समजा असा इशारा देखील धस यांनी दिला आहे. तसेच आकाच्या आकाला मारहाणीचे व्हिडिओ दाखवले असले तर आकाचे आका यांची देखील जेलवारी निश्चितच आहे असे आमदार सुरेश धस यांनी हिंदू गाण्यातून म्हटले आहे.
आमदार सुरेश धस यांनी ‘करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी’ असं म्हणत धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला आहे. याप्रकरणी आमदार सुरेश धस म्हणाले की, “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का हा लागलाच पाहिजे. कारण त्यांना मोक्का लागला म्हणजे, चार ते पाच वर्ष ते काही बाहेर येत नाहीत” असं धस म्हणाले आहेत.
… तर आमचे लोक आनंदी राहतील : आ. धस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले, मात्र त्यावर देखील आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले की, “अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले. तसेच बीड जिल्ह्यातील सर्व हत्या नेमक्या कोणी घडवून आणल्या, त्याचे रेकॉर्ड देखील पाहा. हवे तर त्यासाठी बारामतीची माणसे देखील पाठवा आणि चौकशी करा. याशिवाय आमचा जिल्हा बिन मंत्र्यांच्या राहू द्या. कारण त्यानंतर तरी लोक आनंदी राहतील” असे सुरेश धस म्हणाले आहेत.
याशिवाय बीडमध्ये मराठा समाजालाच नव्हे तर इतर कोणत्याही जातीच्या लोकांना पण काय वागणूक मिळत आहे, ते देखील पाहिले गेले पाहिजे असं आमदार धस म्हणाले आहेत.