Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या राज्यात पुन्हा कठोर निर्बंध ? – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध ? – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
303
जामखेड न्युज – – – 
      डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने सध्या राज्यात चिंता व्यक्त आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं संकट कायम असल्याने घाईघाईत व्यवहार खुले करू नका व गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. यादरम्यान डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. डेल्टा प्लस व्हायरसमुळे देशात करोनाची तिसरी लाट येणार?; महाराष्ट्राला कितपत धोका?
“डेल्टा प्लसचे आतापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत. पण हा व्हायरसमध्ये झालेला बदल (रिप्लेसमेंट) नाही. म्हणजे आधी डेल्टा होतं आणि आता डेल्टा प्लसने त्याची जागा घेतली असं झालेलं नाही. मोठ्या संख्येने रुग्ण नसले तरी शोध सुरु आहे. सर्व जिल्ह्यांमधून १०० नमुने घेऊन त्याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये लसीकरण केलेल्यांना पुन्हा संसर्ग झालाय का वैगेरे अशी बाबी समजून घेत आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. “२१ पैकी ८० वर्षाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून इतर रुग्ण स्थिर आहेत. काहीजण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध
दरम्यान डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का? असं विचारण्यात आलं असता राजेश टोपे यांनी सांगितलं की, “निर्बंध लावण्याचं कोणतंही कारण नाही. आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करत योग्य वर्तन ठेवणं गरजेचं आहे. ते जर पाळलं तर अडचण येण्याचं कारण नाही”.
“तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारी करत असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आलं असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले आहेत. करोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, “दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे”.
सातत्याने संसर्ग वाढणाऱ्या सात जिल्ह्याबद्दल बोलताना टास्क फोर्सच्या सदस्यांनी सांगितले की, “या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती दूर करुन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!