Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या कोविड सुसंगत वर्तणूक नसणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी...

कोविड सुसंगत वर्तणूक नसणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी – जिल्ह्यात आजपासून आयसीएमआरच्या वतीने सिरोसर्वे

0
255
जामखेड न्युज – – – – – 
जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी नियम मोडणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
      कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज विकसित झाल्यात किंवा नाही, याची चाचणी करण्यासाठी आजपासून सिरोसर्वे केला सुरू केला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे. तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे शक्यतो टाळावेत अथवा कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन परवानगी दिलेल्या मर्यादेतच करावेत, असे आवाहनही त्यांनी जिल्हावासियांना केले आहे.
सध्या रुग्णसंख्या काहीशी घटल्याचे चित्र असले तरी अद्याप काही तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन गांभीर्यांने करणे गरजेचे आहे. आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा कार्यरत असली तरी प्रत्येक जिल्हावासीयांनी अधिक सजगपणे प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत तालुका यंत्रणांनी काळजी घ्यावी. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांनीही आजाराची लक्षणे जाणवल्यास तत्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत. यापैकी कोणी बाधित आढळल्यास त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची नावे आरोग्य यंत्रणेला दिल्यास तात्काळ त्यांच्या चाचण्या करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास निश्चितपणे मदत होईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
*जिल्ह्यात आजपासून सिरोसर्वे*
जिल्ह्यातील नागरिकांत कोरोना विषाणू विरु्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज तयार झाल्यात किंवा नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी आजपासून जिल्ह्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने सिरोसर्वे केला जाणार आहे. जिल्ह्यातील विविध गावातील आणि विविध वयोगटातील ४०० जणांची चाचणी यासाठी केली जाणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात तीन वेळा सिरोसर्वे करण्यात आले होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सिरे सर्वेलन्स अधिकारी डॉ. चेतन खाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली.
जिल्ह्यातील गणोरे (ता. अकोले), आंभोरे (ता. संगमनेर), रामपूरवाडी (ता. राहाता), सलाबतपूर (ता. नेवासा), ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव), खंडाळा (ता. नगर), पारनेर (ता. पारनेर), बेलगाव (ता. कर्जत), कोपरगाव नगरपालिका वॉर्ड नं. ११, अहमदनगर महानगरपालिका वॉर्ड नं.४४ तसेच जिल्हा रुग्णालय येथील आरोग्य कर्मचारी आदी ठिकाणी हा सर्वे होणार आहे.
यापूर्वी झालेल्या सर्वेमध्ये मुलांची चाचणी केली गेली नव्हती. या सर्वेमध्ये सहा ते १७ वर्षे वयोगट आणि अठरा ते त्यापुढील वयाच्या व्यक्ती यांची तपासणी करुन त्यांच्या मध्ये अॅण्डीबॉडीज विकसित झाल्यात किंवा कसे याचा अभ्यास केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!