मस्साजोगचे पोहे महाराष्ट्रात प्रसिद्ध पोहे व्यवसायाने गावाला बनवले करोडपती

0
202

जामखेड न्युज—–

मस्साजोगचे पोहे महाराष्ट्रात प्रसिद्ध
पोहे व्यवसायाने गावाला बनवले करोडपती

अहमदनगर ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातलं १९७४ लोकसंख्या असलेले मस्साजोग नावाचं एक छोटसं गाव. गाव तसं दुष्काळी पण गावातील स्वादिष्ट पोह्याच्या चवीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची किर्ती पसरली आहे. एका अनुसूचीत जातीतील व्यक्तीने छोट्याशा पान टपरीत थाटलेल्या पोह्यांच्या व्यवसायाने आता मस्साजोग गावाचे नाव फक्त मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात लैकीक केलं आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्र्यांनाही या पोह्याची चव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये. एवढंच नाही तर या पोह्याने गावातील अनेकांना करोडपती बनवलंय.


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील अदिवासी कुटुबांतील सतिश सोपानराव जाधव हे गृहस्थ. पोटापाण्यासाठी त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी औरंगाबाद गाठलं. हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून त्यांनी औरंगाबाद मधील उस्मानपुरातील गोपाळ टि रेस्टॉरंट येथे १९८१ ते १९८४ या तीन वर्षे काम करून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायचं प्रशिक्षण घेतलं. काही दिवसांनी ज्या रेस्टॉरंट मध्ये काम करत होते ते रेस्टॉरंट बंद पडलं. त्यामुळे जाधव यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. १९८४ साली ते आपल्या मुळगावी म्हणजे मस्साजोग मध्ये आले.

इ. स. १९८४ मध्ये त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी आपण गावातच काहीतरी व्यावसाय केला पाहिजे असं ठरवलं. तेव्हा गावामध्ये फक्त दोन चहाचे हॉटेल सुरू होते. पुढे त्यांनी अहमदनगर ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर स्वत:चा पोह्याचा व्यवसाय एका मोडक्या टपरी मध्ये सुरू केला. त्यावेळेस ते दहावीत शिक्षण घेत होते. लातूरवरून औरंगाबाद कडे जाणारी शिवसेनेचे माजी खासदार दिवगंत मोरेश्वर सावे यांची तीस सीट असणारी ट्रँव्हर्ल्स मस्साजोगच्या बस स्टँण्डवर सकाळी साडेसात वाजता थांबायची. या ट्रॅव्हलमधील सगळे प्रवाशी सतिश जाधव यांच्या टपरीच्या स्वरुपात असलेल्या हॉटेलात नाष्टा कारायचे.त्या ट्रँव्हर्ल्स मध्ये त्याकाळात ३० प्लेट पोहे आणि ३० प्लेट भजे असे मिळून ६० प्लेटची विक्री होत असे. त्यावेळेस ६० प्लेटचे १५० रूपये येत असायचे. एक प्लेट २ रुपये ५० पैशाला असायची. पुढे जे पोहे जाधव यांनी एका टपरीपासून सुरू केले होते तेच पोहे खासदार मोरेश्वर सावे यांच्या ट्रव्हल्समुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झाले. या पोह्यांमुळे मस्साजोग गावाचा कायापलट झाला आणि महाराष्ट्राच्या नकाशावर या गावाचं नाव तोऱ्यात झळकू लागलं.

 

एवढंच नाही तर मस्साजोगच्या पोह्यामुळे गावातील अनेक तरूण व्यवसायाकडे वळत आहेत. ९० च्या दशकात अडीच रूपयांना विकणारी पोह्याची प्लेट आज २५ रूपयांना विकली जाते. या व्यवसायामुळे गावातील अनेक तरूणांना करोडपती बनवलं आहे. तीन हॉटेल असलेल्या गावात आजच्या घडीला १५ ते १६ हॉटेल आहेत. सध्याची मस्साजोगच्या हॉटेल व्यवसायिकांची परिस्थिती पाहिली तर प्रगतशील पातळीवर आहे. मस्साजोगच्या प्रसिद्ध पोह्यांच्या व्यावसायाला ३९ वर्षे पूर्ण झाले आहेत. दिवंगत खासदार मोरेश्वर सावे, दिवंगत गोपीनाथ मुंडे, दिवंगत प्रमोद महाजन, दिवंगत आर. आर. पाटील, पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे, माजी आमदार भिमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, महादेव जानकर, माजी आमदार राम शिंदे, आमदार विक्रम काळे, प्रवक्ते प्रदीप सोळुंके अशा दिग्गज मंडळींनी या ठिकाणी आवर्जून भेटी दिल्या आहेत. सतीश जाधव यांनी सुरू केलेल्या व्यवसाय आता बराच वाढला असून मस्साजोगच्या हॉटेल व्यावसायकाला दिवसाला दोनशे किलोपेक्षा जास्त पोहे लागतात. यामुळे गावामध्ये दररोज लाखो रूपयांची उलाढाल होते, या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ असते त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी सुप्रसिध्द असलेल्या पोह्यांचा स्वाद घेण्यासाठी थांबतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here