आम्ही चुकलो असतो, तर आम्हाला लोकांनी समर्थन दिले नसते. गाडीतून जाताना तोंड फिरवले असते, असा दावा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. ते मालेगावात बोलत होते. बंडखोरांच्या मतदारसंघात सत्कार समारंभ आणि इतर कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू आहे.
आज ते मालेगावात आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंची शिवसेना पुढे न्यायची आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर मी मुलाखत देईन त्या दिवशी राज्यात भूकंप होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. तर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत राजकारण झाले.
त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे शिंदे म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिला आहे. तुम्ही लढवय्ये आहात. बाळासाहेबांचे नाव तुम्ही उज्ज्वल कराल, असे मोदी आपल्याला म्हणाल्याचे शिंदे यांनी सांगितले. माझे संपूर्ण भाषण त्यांनी ऐकले. मनापासून आपण भाषण केले, असे मोदी (Narendra Modi) म्हणाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
‘आषाढी एकादशीची पूजा केली, त्याला भाग्य लागते’
आषाढी एकादशीची पूजा करायला मी पंढरपूरला गेलो होतो. भाग्य लागते त्याला, असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले, की मी स्वत: ला भाग्यवान समजतो. तेथील विविध कार्यक्रमांना मी हजर होतो. ज्या ठिकाणी मी गेलो, तेथे रस्त्याच्या दुतर्फा हजारो माणसे होते. हात उंचावून त्यांनी माझे स्वागत केले. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास त्यांनी दिला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर आम्ही कोणालाही पळवले नाही. आम्ही कोणाचाही विरोध करत नाही, हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले.