Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या एसटी कर्मचारी कामावर परतल्यानंतरही निर्माण झाली नवी अडचण

एसटी कर्मचारी कामावर परतल्यानंतरही निर्माण झाली नवी अडचण

0
226
जामखेड न्युज – – – – 
विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी, ओसरलेली करोना लाट आणि लग्नसराई यांमुळे राज्यातील नागरिक विश्वासार्ह असलेल्या एसटी फेऱ्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सहा महिन्यांच्या संपानंतर राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत. मात्र, नादुरुस्त गाड्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने कर्मचारी आले, गाड्या कुठे आहेत. ग्रामीण भागात तर अद्यापही बहुसंख्य गाड्या बंदच आहेत. ग्रामीण भागातील गाड्या कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या प्रदेशांतून सुटणाऱ्या गाड्या प्राधान्याने मुंबईसाठी पाठवण्यात येत आहेत. एसटीचा प्रवासी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवासी असले, तरी ग्रामीण भागातील प्रवासी एसटी नसल्याने काळी-पिवळी, मॅक्सीकॅब, खासगी बस या प्रवासी साधनांवर अवलंबून आहेत. संपकाळात महामंडळाचे कर्मचारी पुन्हा कामावर आल्यानंतर वाहतूक कशी सुरू करणार, कोणत्या मार्गावर गाड्या धावणार, याचे नियोजन केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. मे महिन्यात एसटी महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळते, मात्र सध्याची स्थिती पाहता या कमाईवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
संपापूर्वी एसटीतून एकूण ६० लाख प्रवासी प्रवास करत होते आणि रोजचे उत्पन्न सुमारे २० ते २२ कोटी इतके होते. सध्या महामंडळाच्या ताफ्यातील १२ हजार गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी योग्य आहेत. उर्वरित पाच हजार गाड्या नादुरुस्त आहेत, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
२४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, पुणे विभागातून सर्वाधिक ७,५१७ एसटी बसच्या फेऱ्या धावल्या. अमरावती विभागात सर्वात कमी २,९६८ फेऱ्या मार्गस्थ झाल्या. नाशिक ६,५०९, औरंगाबाद ५,९७६, नागपूर ३,२९९ आणि मुंबई विभागातून ५,९४७ फेऱ्या झाल्या. अशा प्रकारे महामंडळाच्या गाड्यांच्या एकूण ३२,२१६ फेऱ्या मार्गस्थ झाल्या. यातून २१ लाख प्रवाशांनी वाहतूक केली. महामंडळाने १३.१५ कोटींचे उत्पन्न मिळवले. सध्या ८३ हजारांहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
दरम्यान, २२ एप्रिलनंतर संपकरी कामावर परतल्याने एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास नागरिकांना होता. प्रत्यक्षात एसटी फेऱ्यांच्या कमतरतेमुळे खासगी वाहनांवरच प्रवासी अवलंबून आहेत. सध्या सुरू असलेल्या अनेक गाड्या या रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!