जामखेड न्युज – – – –
२००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी ४९ आरोपींपैकी ३८ आरोपींना आज फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर इतर ११ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात न्यायालयाने मंगळवारी 49 जणांना दोषी ठरवलं होतं. तर 28 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. या दोषींच्या शिक्षेच्या कालावधीबाबत सोमवारी सरकारी विकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर आज न्यायालयाने 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
तब्बल 14 वर्षानंतर निकाल
2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात एकूण 56 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जखमी झाले होते. गुजरातच्या सर्वात मोठ्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी 28 जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. तब्बल 14 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे.
70 मिनिटांत तब्बल 21 बॉम्बस्फोट
26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद शहरात 70 मिनिटांत तब्बल 21 बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. 2002 च्या गुजरात दंगलीचा (गोध्रा हत्याकांड) बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे हल्ले केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
78 आरोपींवर खटला
अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनीच पोलिसांनी सुरतच्या विविध भागातून अनेक स्फोटकं जप्त केली होती. यानंतर अहमदाबादमध्ये 20 आणि सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले. न्यायालयाने सर्व 35 एफआयआर एकत्रित केल्यानंतर डिसेंबर 2009 मध्ये 78 आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला.