नाशिक विभागीय कार्यालयाचा कारखाना बंद करण्याचा आदेश

0
562
जामखेड न्युज – – – – 
 श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता. 11) पहाटे मोठा स्फोट झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे साडे चार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रीगोंदा साखर कारखान्याची मळीची टाकी फुटल्याने साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात व कारखान्यांत घुसली.
याचबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान परिसरातील शेतीसह नागरी वस्तीला प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेत MPCB नाशिक विभागीय कार्यालयाने कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहे.
नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळी साठवण टाकीचे तापमान वाढून हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. टाकी फुटल्याने जवळपास 4 हजार टन मळी वाहून गेली. टाकीचा स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत पडली. तसेच संपूर्ण परिसर या स्फोटाने हादरला. सध्या नागवडे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे.
कारखान्यात साखरेसह उपपदार्थ तयार केले जातात. कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील टाक्यांमध्ये मळी साठविण्यात येते. गुरुवारी पहाटे अर्कशाळेतील टाकीच्या आतील तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा स्फोट झाला. त्यात ही टाकी फुटली. या टाकीची साठवण क्षमता साडे चार हजार टन असून, तीत 4 हजार 100 टन मळी साठविली होती. टाकी फुटल्याने सगळी मळी वाहून गेली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेजारची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडे चार कोटींचे नुकसान झाले कारखान्याशेजारील शेतात ही मळी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here