जामखेड प्रतिनिधी –
“आज पंधरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. वर्हाडी , अहिराणी, कोकणी आदी मराठीच्या बोली असून या सर्व बोलीभाषेतून कितीतरी ज्ञान व नवे शब्द प्रमाण भाषेला मिळून मराठी भाषा सशक्त व तेजस्वी बनते. शिक्षण घेताना इंग्रजी माध्यमाच्या आहारी न जाता आपल्या या तेजस्वी मातृभाषेतूनच शिक्षण घेतल्यास बौद्धिक विकास उत्तम होतो ” असे प्रतिपादन प्रा. सखाराम सप्रे यांनी ‘बोली व प्रमाण भाषा’ या विषयावरील व्याख्यानात केले. मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने श्री. नागेश कनिष्ठ महाविद्यालयातील विशेष व्याख्यानमालेत प्रा. सप्रे यांनी विचार मांडले. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य हरिभाऊ ढवळे यांनीही विज्ञानात मातृभाषेचे महत्त्व सांगितले. मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक प्रा.आ. य. पवार यांनी प्रस्ताविक करत उपस्थित मान्यवरांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कुंडल राळेभात यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रकाश तांबे यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. जतीन काजळे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रा, मधुकर राळेभात, हरिभाऊ बेलेकर, डॉ. विद्या काशीद, रमेश बोलभट , शिक्षक वृंद उपस्थित होते.