पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

0
275
जामखेड न्युज – – – 
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला,
नेमकं काय झालं होतं ?
कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.
पोलीस गाडीसमोर उभे राहिले आणि फोनवर वरिष्ठांशी बोलत असल्याचं सांगू लागले. मात्र बराच वेळ हा प्रकार सुरु असल्याने निलेश राणे संतापले आणि पोलिसांसोबत वाद घालू लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना सवाल केला.
दुसरीकडे पोलिसांनी वरिष्ठांशी आम्ही चर्चा करत असून अद्याप न्यायायलयाचा निकाल आला नाही असं सांगू लागले. त्यानंतर निलेश राणेंनी निकाल खुल्या न्यायालयात लागला असून तुम्ही अशाप्रकारे एखाद्या आमदाराला थांबवू शकत नाही असं म्हणत रस्ता मोकळा करण्यास सांगितलं. मात्र तरीही पोलीस गाडी समोरुन न हटल्याने, “कशासाठी आम्ही थांबायचं ते सांगा, कोर्टाचा अपमान आम्ही करतोय की तुम्ही,” असा प्रश्न पोलिसांना विचारला.
यावर पोलिसांनी सहकार्य करा असं सांगताच निलेश राणे, “१० मिनिटांपासून उभाय मी, मी सहकार्य करतोय. कुठल्या अधिकाराखाली तुम्ही आमदाराला गाडीत बसवलंय ते सांगा,” असा प्रश्न चढ्या आवाजात विचारला.
वैभव नाईकांचं पोलिसांना पत्र –
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदूर्गच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, “जिल्ह्यात जमावबंदी आदेश असतानाही निलेश राणे यांनी सत्र न्यायालयाच्या बाहेर बंदोबस्तासाठी तैनात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत: व त्यांच्या २५ च्या आसपास समर्थकांनी अरेरावी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तरी याबाबत सखोल चौकशी करुन निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा”.
…म्हणून नितेश राणेंची गाडी थांबवण्यात आली होती
आता ऑर्डर झाली म्हणून संपलं असं त्यांना वाटलं होतं. आम्ही अर्ज केला आहे त्यावर तुम्हाला म्हणणं मांडायचं आहे. त्यामुळे परत चला हे सांगण्यासाठी नितेश राणेंना थांबवण्यात आलं होतं. त्यांचे वकील पुन्हा कोर्टात आले होते. सर्वांना थांबणं भाग होतं त्यामुळे नितेश राणेंना थांबवलं असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here