जामखेड न्युज – – – –
वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आलीय.
सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांबरोबरच एका आमदाच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला.
नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. जवळपास 40 फूट उंच असलेल्या पुलावरून कार खाली पडल्यानं भीषण अपघात झाला.
सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे.
मृतांची नावे निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे. यापैकी अविष्कार हा तिरोडाचे भाजपाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.
पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून एक्सयुव्ही गाडी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्यानं वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले आहेत. सातही विद्यार्थी दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.