जामखेड न्युज – – –
देशातील सर्वात रूंद म्हणून ओळखले जाणारे दोन बोगदे इगतपुरीजवळील कसारा घाटात विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भारतीय अभियांत्रिकी इतिहासात पहिल्यांदाच असा भीमपराक्रम झाला आहे.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सध्या सुसाट सुरू आहे. याच मार्गावर नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंत या महाकाय दुहेरी बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्यांची लांबी तब्बल आठ किलोमीटर आहे, तर रूंदी 17.5 मीटर आहे. या बोगद्यांचा मुंबईला जाण्यासाठी व येण्यासाठी वापर होणार आहे. कसारा घाट भेदून हे बोगदे एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तयार केले आहेत. प्रकल्पाचे व्यवस्थापक शेखर दास, अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, एकूण 1500 कामगार, 150 अभियंते अशा टीमने हे भवदिव्य शिवधनुष्य पेलले आहे.
ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान तयार करण्यात येत आहे. या महामार्गाची लांबी 700 किलोमीटर आहे. त्यासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. इगतपुरी जवळी बोगद्यासाठी 2745 कोटींचा खर्च आला. या कामाची सुरुवात 6 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. सप्टेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. त्यापूर्वीच 14 सप्टेंबरला हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी ऑस्ट्रियन तंत्रज्ञान वापर करण्यात आला. सध्या कसारा घाट पार करण्यासाठी 35 मिनिटे लागतात. आता या बोगद्यांमुळे अवघ्या पाच तासांत कसारा घाट पार करता येणार आहे.
कठीण खडकाचे आव्हान
कसारा घाटातील खडक फोडणे हे या टीमसमोरचे सर्वात मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एफकॉन्स कंपनीच्या शिलेदारांनी ते विक्रमी वेळेत पूर्ण केले. हे काम पूर्ण होताच कामगार आणि अभियंत्यांनी एकच जल्लोश केला. आता या बोगद्यांमध्ये रस्ताबांधणी, व्हेंटीलेशन, विद्युत जोडणी आदी कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंत तयार करण्यात आलेल्या आठ किलोमीटर लांबीचा बोगदा फक्त 2 वर्षांत पूर्ण झाला आहे. अभियांत्रिकीच्या इतिहासातील भारतातील हा पहिला असा बोगदा आहे की, ज्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे.
– अनिलकुमार गायकवाड, सचिव, सार्वजनिक बांधकाम
विभाग