श्रीगोंद्यात उद्या २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा,
सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती – ॲड. डॉ. अरुण जाधव
भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक ‘मुशाफिरी यात्रे’चा भव्य समारोप सोहळा उद्या सोमवार, २९ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील लिंपणगांव येथील भिल्ल वस्ती (धनगर वस्ती) येथे सकाळी ११:०० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना व जनगणनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात काढण्यात आलेल्या ‘मुशाफिरी यात्रा’चा समारोप सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्रीगोंदा तालुक्यातील भिल्लवस्ती (धनगर वस्ती), लिंपणगाव येथे होणार आहे. या समारोप सोहळ्यास भटके-विमुक्त समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने संत कबीर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला ४ जून ते १४ जून २०२६ या कालावधीत मोठा प्रतिसाद मिळाला. या यात्रेदरम्यान उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि सुमारे ११० गावांमध्ये तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास करण्यात आला. या प्रवासात सुमारे १० हजार नागरिकांशी संवाद साधत भटके-विमुक्त समाजाच्या विविध समस्या, शासन योजनांचा लाभ, जनगणना आणि घरगणनेतील समावेश याबाबत जनजागृती करण्यात आली.
समाजातील अनेक कुटुंबे आजही घरगणना आणि जनगणनेपासून वंचित राहतात. त्यामुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या पार्श्वभूमीवर भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि समाजाला त्यांच्या अधिकारांविषयी जागृत करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते सुजात (दादा) आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव व सौ. उमाताई जाधव हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचल्याकार लक्ष्मण गायकवाड असतील. यावेळी प्रा. किसन चव्हाण, योगेश साठे, बाबू औटी, भालचंद्र सावंत, आप्पा सोनवणे, अनिल सावंत, संतोष जगताप, शिवाजी नवरे, मुमताजताई शेख, अंकर चव्हाण, बापू माने, गणेश पोळ, मारुती भिसेगणे, अनिल जाधव, सोमनाथ भेगुळे, संजय सावंत यांच्यासह विविध जिल्ह्यांतील भटके-विमुक्त समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
समारोप कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भटके-विमुक्त समाजाच्या हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.