बाफना यांच्या पाठपुराव्याने उशिराची एसटी वेळेत ; महिला प्रवाशांना दिलासा
रत्नापूर, पाटोदा, अरणगाव, माहिजळगाव ते कर्जत दरम्यान धावणारी सायंकाळची एसटी बस गेल्या काही दिवसांपासून तब्बल दोन तास उशिराने येत असल्याने महिला प्रवासी, विद्यार्थिनी तसेच नोकरदार वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर ही बससेवा वेळेत सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील रत्नापूर, पाटोदा, अरणगाव या ठिकाणतील अनेक प्रवासी महिला जामखेड शहरात नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त ये-जा करतात. मात्र बस उशिराने येत असल्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर थांबावे लागत होते.
त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. अनेक दिवस संबंधित समस्येबाबत तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती.
गेल्या अनेक दिवसांपासून महिलांनी अनेक जणांकडे याबाबत तक्रार केली पंरतु कोणीही प्रतिसाद दिला नाही.अखेर महिलांनी आपली समस्या शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी जामखेड आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे यांना निवेदन दिले. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी जामखेड बसस्थानकावर विशेष सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली.
याशिवाय अहिल्यानगर येथील वाहतूक नियंत्रक रविंद्र जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बससेवा पूर्ववत वेळेत सुरू करण्याची मागणी केली.
प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेत सायंकाळची बस वेळेत सुरू केली. त्यानंतर आकाश बाफना यांनी बसस्थानकावर प्रत्यक्ष भेट देऊन बस वेळेत येत असल्याची पाहणी केली. तसेच प्रवाशांशी संवाद साधून इतर समस्यांची माहितीही जाणून घेतली.
महिला प्रवाशांचा प्रवासाचा प्रश्न मार्गी लागल्याने बाफना यांनी जामखेड आगाराचे आभार मानले. यावेळी उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करत आकाश बाफना यांचे आभार मानले.
यावेळी शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे,जामखेड एसटी आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे, वाहतूक नियंत्रक शिवदास उगले, चालक अनिल चौगुले, वाहक वैभव भांगे, विठ्ठल जायभाय, अशोक कुमटकर, दत्तात्रय जगताप, अनिकेत देशमुख तसेच प्रवासी मोनिका सरकाळे,सारीका वारे,दिपाली शेख ,अनिता जाधव आदी महिला प्रवासी उपस्थित होते.