खासदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारसंदेश हजारे यांना आदर्श शेतकरी मित्र’ पुरस्कार प्रदान
दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या “कृषीगंगा” भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २०२६ या सोहळ्यात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शेतकरी मित्र पुरस्कार प्रदान करून दैनिक लोकमतचे पत्रकार मा. संदेश हजारे यांचा गौरव करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार खासदार लोकनेते निलेश लंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत ठामपणे पोहोचवणाऱ्या संदेश हजारे यांच्या पत्रकारितेची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
शेतीमालाला योग्य बाजारभाव, पीकविमा दावे, सिंचन समस्या, दुष्काळी परिस्थिती, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नवतंत्रज्ञानाचा वापर अशा विविध विषयांवर त्यांनी केलेल्या वृत्तांकनाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
“कृषीगंगा” प्रदर्शनाचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पारनेर-नगर, निलेश लंके प्रतिष्ठान तसेच “आपला मावळा, महाराष्ट्र राज्य” यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. राज्यभरातील राजकीय राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कृषी तज्ज्ञ, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, ड्रोन तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कृषीपूरक उद्योग तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्रे, तज्ज्ञांचे व्याख्यान आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे प्रदर्शनाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले.
पुरस्कार स्वीकारताना संदेश हजारे यांनी हा सन्मान शेतकरी व ग्रामीण जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आपली लेखणी यापुढेही तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या मानाच्या गौरवाबद्दल संदेश हजारे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.