जामखेड न्युज – – –
ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आज कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
मुंबईत पावसाचा अंदाज काय?
मुंबईत देखील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. आज आणि उद्या मुंबई हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई 18 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात काय आहे पावसाची स्थिती?
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बघायला मिळेल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ह्या पावसामुळे मराठवाड्यातील पीकांना दिलासा मिळणार आहे. आज औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात काय स्थिती?
विदर्भात आज काही ठिकाणी प्रामुख्याने पश्चिम विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भात 17 आणि 18 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. विदर्भासाठी १८ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती?
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र, 19 ऑगस्टनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा चांगला जोर बघायला मिळणार आहे. प्रामुख्याने घाट परिसरात चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे. नाशिकसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.