जामखेड शहरात सततच्या ट्रॅफिक जाम मुळे नागरिक व वाहनधारक हैराण
राष्ट्रीय महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे नागरिकांना अडीच वर्षांपासून त्रास
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे अडीच वर्षांपासून काम सुरू आहे. शहरातील काम अर्धवट असल्याने तसेच अतिक्रमण न हटविल्याने रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. विश्वक्रांती चौक बीड रोड ते बस स्थानक पर्यंत दररोजच रहदारीची समस्या निर्माण होत आहे. यात रुग्णवाहिका, अधिकारी, पदाधिकारी, लग्नाची वऱ्हाडी मंडळी, नवरदेव वरात, महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातून बाहेर पडण्यासाठी तास भर वेळ लागत आहे. लवकरच राष्ट्रीय महामार्गाचे काम व्हावे अशी मागणी जोर धरू लागत आहे.
आज शनिवार आठवडे बाजार व मोठी लग्न तिथी असल्याने दुपारी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाले होते यात अनेक नवरदेवाच्या वरातीही अडकल्या होत्या. शहरातील रस्त्यावर थोडा पाऊस झाला की सगळीकडे चिखल दलदल होते. वाहने घसरतात तर नंतर धुळीचा मोठा प्रादुर्भाव होतो. शहरवासीयांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता नेमका का होत नाही. कोणाची काय अडचण आहे. अधिकारी पदाधिकारी गप्प का? अशी चर्चा जामखेड शहरात सुरू आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत अठरा महिन्यांची असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्ता कुठे खोदून ठेवलेला तर कुठे टाकलेला मुरूम, कुठे खडी तसेच सलग काम न करता कामात धरसोड, हवा तेवढा रस्ता उकरलेला नाही. यामुळे नागरिकांना होणारा त्रास, तसेच सिमेंट रस्त्यावर दिशादर्शक फलक नसणे, काम सुरू वाहने सावकाश चालवा फलक नसणे, रेडियम नसणे, यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मागे काही महिन्यापूर्वी शहरामध्ये प्रशासनाने कारवाई करताना दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. गोरगरीबांना रस्त्यावरून ऊठ तर धनदांडग्यांना दिलेली सूट पाहता संताप व्यक्त केला आहे. या वेळेस लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एक दिलाने काम करून ‘उद्याच्या भविष्यातील जामखेड’ होण्यासाठी सरसकट अतिक्रमण मुक्त जामखेड करावे अपेक्षा सुजन नागरिक करत आहे.लवकरात लवकर अतिक्रमण हटवून सुसज्ज रस्ता बनवावा अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये आहे.
शहरातील रस्ता अनेक ठिकाणी खोदलेला, काही ठिकाणी मुरूम खडी ढिगारे, एकेरी वाहतूक व्यापाऱ्यांच्या दारात खडी व मुरूम ढिगारे, खोदलेला रस्ता यामुळे सगळीकडे धुळ यामुळे शहरातील बीड रोडवरील व्यापारी वर्ग तसेच नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही दुकाने कशी चालवायची असा प्रश्न केला होता. ठेकेदारांने राॅयल्टी का भरलेली नाही, नेमके महसूल विभागाला शहरात अडचणीच्या ठिकाणी काम असताना राॅयल्टीचे सूचले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक या शहरातील मार्गाला मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर खडी मुरूम अंथरून ठेवलेला आहे. टायरखाली खडी उडून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना मणके विकार झाले आहेत. तर आता पावसाळ्यात चिखल व दलदल होणार आहे. कालच्या थोड्याच पावसाने रस्त्यावर चालता येत नाही. तसेच रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. विश्वक्रांती चौक बीड रोड ते बस स्थानक पर्यंत दररोजच रहदारीची समस्या निर्माण होत. लवकरात लवकर सुसज्ज रस्ता व्हावा अशी मागणी होत आहे.