जामखेड न्युज – – – –
राज्य शासनाने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. एका युजर्सने ट्विट करुन, 31 जुलैपूर्वी आपण MPSC आयोगातील रिक्त जागा भरणार होता, त्याचं काय झालं?, असा सवाल विचारला. त्यावर रोहित पवारांनी हे उत्तर दिलं.
ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी 12 आमदारांची यादी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाहीय. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी राज्यपालांना चिमटा काढला.
युजर्सच्या प्रश्नाला रोहित पवारांचं उत्तर, त्याचवेळी राज्यपालही निशाण्यावर
ट्विटरवर विकास भारती नावाच्या एका युजर्सने 31 जुलै च्या आधी MPSC आयोगातील सदस्य भरणार होते, काय झालं? असं सवाल विचारणारं ट्विट केलं. त्या युजर्सच्या प्रश्नाला उत्तरं देणारं ट्विट रोहित पवार यांनी केलं. ज्यातून 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं.
अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.
राज्याच्या हिताच्या कोणत्याही निर्णयात खोडा घालण्याचा राज्यपालांचा कलकलमी कार्यक्रम
31 जुलैपूर्वी एमपीएससी आयोगामधील रिक्त जागा भरण्यासंदर्भात अजितदादांनी विधानसभेत शब्द दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवली. पण राज्याच्या हिताचा कोणताही निर्णय असला की त्याला खोडा घालण्याचा एककलमी कार्यक्रम राज्यपालांनी हातात घेतलाय की काय असा प्रश्न पडतो. कारण हा निर्णय देखील त्यांनी रखडवून ठेवला आहे, असा टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
31 जुलैपर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा भरणार, अजितदादांनी केली होती घोषणा
पुण्याच्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी तसंच एमपीएससीचा कारभार गतीमान व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. 31 जुलैपूर्वी आयोगातील सर्व महत्त्वाची पदे भरण्यात येतील, अशी माहिती त्यांनी अधिवेशन काळात विधानसभेत दिली. त्यानुसार 31 जुलैपूर्वीच सदस्यांची यादी राज्य शासनाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे.