जामखेड न्युज – –
माजी भारतीय क्रिकेटर आणि 1983 क्रिकेट विश्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणारे यशपाल शर्मा यांचं मंगळवारी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने यशपाल यांची प्राणज्योत मावळली आहे. यशपाल हे भारतीय टीममधील माजी मिडल ऑर्डर फलंदाज होते. याशिवाय ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य देखील होते.
1983 च्या विश्वचषकात बजावली होती मोलाची कामगिरी
यशपाल शर्मा कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. त्यांनी 37 एकदिवसीय आणि 42 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते 1979-83 दरम्यान भारताच्या मध्यम फळीचा एक महत्त्वाचे फलंदाज होते. काही वर्षे त्यांनी राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आणि 2008 मध्ये पुन्हा पॅनेलवर त्यांची नेमणूक झाली होती.
यशपाल शर्मा 66 वर्षांचे होते. यशपाल शर्मा 1983 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारे दुसरे खेळाडू होते. त्यांनी 37 कसोटी सामन्यात 33.45 च्या सरासरीने 1606 तर 42 एकदिवसीय सामन्यात 28.48 च्या सरासरीने 883 धावा केल्या आहेत.
कपिल देव यांना अश्रू अनावर
यशपाल यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी ज्या कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषकात मोलाची कामगिरी केली होती. त्या कपिल देव यांना देखील आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूची बातमी ऐकून गहिवरून आलं. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान कपिल देव यांना रडू कोसळलं. सोशल मीडियावर यशपाल यांच्या आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.