Thursday, February 12, 2026
Home राजकारण आमदार सत्यजीत तांबे यांच्या २०० दिवसांच्या कामाचा ‘रिझल्ट’ जाहीर लोकांच्या सुचनांमुळे...

आमदार सत्यजीत तांबे यांच्या २०० दिवसांच्या कामाचा ‘रिझल्ट’ जाहीर लोकांच्या सुचनांमुळे नवीन काम व सुधारणा करायला ऊर्जा मिळते

0
126

जामखेड न्युज——

आमदार सत्यजीत तांबे यांच्या २०० दिवसांच्या कामाचा ‘रिझल्ट’ जाहीर

लोकांच्या सुचनांमुळे नवीन काम व सुधारणा करायला ऊर्जा मिळते

 

निवडणुकीदरम्यान मतदारांना भेटण्यासाठी चपला झिजवणारे लोकप्रतिनिधी त्यानंतर पुढील पाच वर्षं अजिबात दिसत नसल्याची खंत अनेकदा व्यक्त होते. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे दुसऱ्यांदा आपल्या कामगिरीचं प्रगतीपुस्तक घेऊन जनतेसमोर आले आहेत. आ. तांबे यांनी २०० दिवसांचं सर्वेक्षण घेत जनतेला आपल्या कामाचं मूल्यमापन करायला सांगितलं होतं. आताही ते ऑनलाइन माध्यमातून लोकांसमोर गेले असून लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, लोकांना त्यांची कामगिरी कशी वाटते, काय सुधारणा हव्या आहेत, या बाबी सर्वेक्षणातून जाणून घेतल्या. रविवारी आ. सत्यजीत तांबे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या फेसबूक लाइव्हवर २०० दिवसांच्या कामाच्या प्रगतीपुस्तकाची माहिती दिली.

निर्वाचित लोकप्रतिनीधी म्हणून गेल्या १०० दिवसांतील एकंदरीत कामगिरी ९१.२१ टक्क्यांनी सुधारली आहे, असे लोकांनी सांगितले. निर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्या १०० दिवसांच्या तुलनेत गेल्या १०० दिवसांतील माझी जनतेसाठी असलेली उपलब्धता ९०.६६ टक्के चांगली असल्याचे सांगितले आहे. अनेक कामाच्या व्यस्ततेमुळे फोन उचलणे, भेट न होणे असं होत असतं. तरी सुद्धा माझ्या कार्यालयातील चार लोक तुम्हाला उत्तर देतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. निर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या २०० दिवसांतील माझ्या कामगिरीचे मूल्यांकन करताना ५८.३२ टक्के ५ स्टार, १९.०७ टक्के ४ स्टार, १३.०७ टक्के ३ स्टार व ०९.०१ टक्के २ स्टार लोकांनी दिले आहेत, अशी माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी दिली.

सर्वेक्षणानुसार, ३५ टक्के लोकांनी थेट संपर्क साधला, ३३ टक्के लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, २१.२६ टक्के लोकांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपर्क साधला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात कामगिरीबद्दल लोकांनी ६४.४१ टक्के ५ स्टार, २२.३४ टक्के ४ स्टार, ११.४३ टक्के तीन स्टार आणि एक आणि दोन स्टार सर्व्हेमध्ये दिले. पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या मुद्द्यांपैकी नागरी व सामाजिक १९.२३ टक्के, युवक आणि क्रीडा १५.०९ टक्के आणि शैक्षणिक ५९.५१ टक्के मुद्दे मांडल्याचे सर्व्हेमध्ये सांगितले आहे. याशिवाय, दैनंदिन कामाबद्दल आणि उपक्रमांबद्दल नागरिकांना नियमित ८२.०९ टक्के अपडेट्स मिळतात, असेही आ. तांबे म्हणाले.

माध्यमांमधील उपस्थिती वाढवली पाहिजे. विधीमंडळाच्या कामकाजातील सुधारणा, उपलब्धता वाढविणे अशा अनेक सुचना जनतेने दिल्या आहेत. या सुचना सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल, अशीही ग्वाही आ. तांबे यांनी दिली. मागील १०० दिवसांच्या सर्वेक्षण मोहिमेत तुमच्याकडून आलेल्या सुचनांना पूर्णपणे न्याय देण्यात ८४.५७ टक्के मी सक्षम ठरलो आहे, असेही त्यांनी सांगितले. २०० दिवसांच्या कामाच्या सर्वेक्षणात साधारणतः २० हजारांच्या आसपास लोकांनी सहभाग घेतला. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे नवीन काम करायला आणि सुधारणा करायला ऊर्जा मिळते, असेही आ. तांबे यांनी स्पष्ट केले.

चौकट

जनतेच्या सुचनेनं काम करायला बळ मिळतं

पुन्हा ३०० दिवस पूर्ण होतील, तेव्हा सुध्दा तुमच्यासमोर येईल. तुमच्या सुचना मी ऐकून घेईन आणि त्या सुचनांचं तंतोतंत पालन करेन. ज्या राजकिय साक्षरतेचा पुरस्करता आहे. त्यात नागरिकच सर्वोच्च आहे. माझा लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करतोय, हे जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे.
– आमदार सत्यजीत तांबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!