जामखेड न्युज——
अधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाच्या बैठकीत आमदार रोहित पवार आक्रमक
कुकडी आवर्तनाच्या नियोजन अभावामुळे कर्जत तालुक्यातील अनेक गावे पाण्यापासून वंचित
कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून या आवर्तनात नियोजनाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे पुरेशा दाबाने आवर्तन सोडण्यात आले नसून यामुळे कर्जत तालुक्यातील करमणवाडी, येसवडी, काळेवाडी, करपडीसह पाच-सहा गावं पाण्यापासून वंचित राहण्याची तसेच थेरवडी , दुरगाव, चिलवडी व कोपर्डी येथील तलावही रिकामेच राहण्याची भीती होती. याचं अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकरी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक घेतली या बैठकीत आमदार रोहित पवार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या कुकडीचे सुरू असलेले आवर्तन हे 30 ऑगस्ट रोजी बंद करण्यात येणार आहे. परंतु असे झाले तर तलावही रिकामेच राहतील आणि अनेक गाव पाण्यापासून वंचित राहतील हीच गोष्ट लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांसह बैठक घेतली आणि ३० तारखेऐवजी ५ सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आणि आवश्यक तेवढे पाणी सोडले जात होते. परंतु सध्या सत्तेत असलेल्या सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळे अनेक गावे पाण्यापासून वंचित राहत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु आमदार रोहित पवार यांनी बैठक घेऊन याबाबत मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांना देखील बरोबर घेतले.
या बैठकीत आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याबाबत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार बदलल्यानंतर झालेल्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य लोकांना त्याची अडचण होतेय, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये असे यावेळी बैठकीत आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना बजावून सांगितलं त्यावर अधिकाऱ्यांनीही सर्व भागाला पाणी मिळेपर्यंत पाणी सुरू ठेवण्याचा शब्द दिला.