जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेतील दिरंगाई संपणार
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष, आ.प्रा राम शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेतील’ नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी उपस्थित केलेल्या या तारांकित प्रश्नांवर रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उत्तर देत या प्रकरणी शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषि आयुक्तालयास दिल्या आहेत.त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या प्लास्टीक अस्तरीकरणाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. राज्याच्या अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेततळ्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असल्याने अनेकवेळा पाण्याअभावी पिके जळून जातात त्याला पर्याय म्हणून शेतकऱ्याना शेततळ्याचा पर्याय उत्तम ठरत असताना शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेतील चुकीच्या व अनियोजित धोरणामुळे त्यात प्रचंड दिरंगाई होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
शासनाच्या महाडीबीटी प्रणाली अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात व त्याची निवड सोडत पद्धतीने केली जाते. शेततळे अस्तरीकरणाकरीता अर्ज केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहा महिने ते तब्बल दोन वर्षाचा कालावधी जातो. यात शेतकरी मेटाकुटीला येतो. या निवड प्रक्रियेतील जटील नियमांमध्ये बदल करण्यात यावा व सुधारणा व्हावी अशी मागणी आमदार प्रा. राम शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली होती.
आमदार शिंदे यांनी या महत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्याने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आता राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील दिरंगाई आता दूर होणार असून शेतकऱ्यांना शेततळ्याच्या कामात दिलासा मिळणार आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आमदार शिंदे यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची व अडचणींची जाण आहे. त्यामुळेच त्यांनी कुकडीचे पाणी, शेतकऱ्यांच्या विविध योजना, कुकडी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला याबाबत नेहमी शासन दरबारी अग्रणी भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे हित जपले आहे.