लम्पी त्वचा रोग बळिराजावर नवे संकट – रोहन विठ्ठल शिंदे

0
206
जामखेड न्युज——
मागील दोन वर्षांपासून लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव देशात होत आहे. यंदा उत्तर भारतात या रोगाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाला आहे. महाराष्ट्रातही ७१ गावांतील पशुधनाला या रोगाचा संसर्ग झाला आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
एकेकाळी सातासमुद्रापार असलेल्या ‘लम्पी’ या संसर्गजन्य आजाराने विदर्भ व मराठवाडय़ातील पशुपालकांची चिंता वाढवली आहे. सध्या विदर्भ व मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढत आहे .
सन २०२० मध्ये राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये, तसेच २०२१ मध्ये १० जिल्ह्यांत लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव आढळून आलेला होता. सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झालेला आढळून येत आहे. पंजाब, हरियाणातील दूध संकलन २० टक्क्यांनी कमी झाले आहे. या दोन राज्यांत पशुपालकांना मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
यंदा राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी त्वचा रोगसदृश रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राज्यामध्ये अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.
   लंपी चर्म रोगाची साथ आतापर्यंत राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ५९ तालुक्यांत पोहोचली आहे. तर लंपी चर्म रोगामुळे राज्यात २५ पशूंचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. राज्यामध्ये जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी आणि सोलापूर या १७ जिल्ह्यांमध्ये आजअखेर १६०  लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील ७४८ गावातील दोन लाख ८० हजार पशुधनाचे लसीकरण झाले आहे. बाधित गावांतील १,४३५ बाधित पशुधनांपैकी ८९५ पशुधन उपचाराने बरे झाले. तर जळगाव जिल्ह्यातील १२, नगर जिल्ह्यात ४, पुणे जिल्ह्यात ३, बुलडाणात २, अमरावतीत ३ आणि अकोल्यात एक अशा एकूण २५ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला. लंपी चर्म रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे.
 तो जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. हा संसर्गजन्य आजार असून, पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे त्यावर प्रभावी असा उपचार उपलब्ध नाही. उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये, या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे ठरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘लम्पी’ आजाराने जनावरे बाधित होत आहेत. ‘लम्पी’ त्वचा रोग हा गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील ‘कॅप्रीप्लॉक्स’ या प्रवर्गात मोडतात. हा एक संसर्गजन्य व साथीचा आजार. या विषाणूचे शेळय़ा मेढय़ांमधील देवीच्या विषाणूशी साम्य आढळून येत असले तरी हा आजार शेळय़ा मेंढय़ांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवास होत नाही. आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. हा रोग सर्व वयोगटातील (नर आणि मादी) जनावरात आढळतो. मात्र, लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत प्रमाण अधिक असते. उष्ण आणि दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते.
या आजाराचा मृत्युदर एक-पाच टक्केपर्यंत आढळून येतो. आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठय़ाप्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गाभण जनावरात गर्भपात होतो आणि प्रजननक्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावरं खूप विकृत दिसतात. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतात.
     विषाणूचे प्रसार माध्यम            
          १.वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगद्वारेही याची लागण होऊ शकते. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. २.दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गाईच्या दुधातून आणि स्तनावरील व्रणातून रोगप्रसार होतो.
३.आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचिड, चिलटे यांच्यामार्फत होतो.             ४.तसेच या आजाराचा प्रसार निरोगी आणि बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १-२ आठवडय़ापर्यंत हा विषाणू रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळय़ातील पाणी आणि तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा आणि पाणी दूषित होते. हा दूषित चारा पाणी निरोगी पशूंच्या संपर्कात आल्यास या विषाणूचा प्रसार होऊन आजाराची लागण होते. त्यामुळे बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे आवश्यक आहे.                              *आजाराची लक्षणे*
१.आजारामध्ये प्रथम जनावराला मध्यम स्वरूपाचा तर काही वेळेस भयंकर असा ताप येतो. जनावरांच्या डोळय़ातून आणि नाकातून पाणी येते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते. २.लसिकाग्रंथीना सूज येते, जनावरांच्या शरीरावर अंदाजे दोन ते पाच से.मी. व्यासाच्या कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास भागात येतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर बऱ्याच कालावधीकरिता अथवा कायमच राहू शकतात. तसेच ३.  तोंडात, घशात आणि श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ आणि फोड येतात. तोंडातील पुरळामुळे जनावरांच्या तोंडातून मोठय़ा प्रमाणात लाळ गळत असते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो.                               ४.डोळय़ात व्रण निर्माण होतात. डोळय़ातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळय़ाची दृष्टी बाधित होते. ५.जनावरांना अशक्तपणा येतो आणि भूक मंदावते, वजन कमी होते. ६.रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. रक्तातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी होते.
आजाराचे निदान लक्षणावरून करता येते. या प्रकारचे लक्षणे  रोगांमध्ये दिसून येतात. त्यामुळे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेमार्फत केले जाते, याकरिता आजारी जनावरांचा उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणीसाठी रक्त, रक्तजल, त्वचा आदींचे नमुने घेणे आवश्यक आहे. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. बाधा झालेल्या जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जीवाणूजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असल्याने उपचारासाठी प्रतिजैविके, तापनाशक, दाहनाशक, वेदनाशामक औषधे, रोग प्रतिकारशक्तिवर्धक जीवनसत्त्व अ, ई आणि बी, शक्तिवर्धक यकृत टॉनिक आदी डॉक्टरांच्या सल्ल्याने ५-७ दिवस उपचार केल्यास बहुतांश जनावरे पूर्णपणे बरी होतात. शेतकरी व पशुपालकांनी जागृत राहण्याची गरज आहे.  
    उपाय                           
       लम्पी त्वचा रोग संसर्गजन्य आहे. औषधोपचाराने बरा होतो, पशुपालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. रोगाचा प्रादुर्भावच होऊ नये, याची प्रथम काळजी घेतली पाहिजे आणि जर संसर्ग झालाच तर कमीत कमी नुकसान होईल, असे नियोजन केले पाहिजे.                               २.संसर्ग झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसांत उपचार सुरू झाले पाहिजेत. अन्यथा जनावरांची अवस्था गंभीर होते. संसर्ग झालेल्या जनावरांचे काटेकोर विलगीकरण केले पाहिजे. खासगी पशुवैद्यकांनी केलेल्या उपचाराला जनावरे प्रतिसाद देत नसतील, तर तातडीने सरकारी यंत्रणेला कळविले पाहिजे. राज्यात निरोगी जनावरांचे लसीकरण सुरू आहे. संसर्ग झालेल्या जनावरांवरील उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत. संसर्ग झालेल्या परिसरातील जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. सरकारकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. 
३.सध्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नाही. मात्र शेळय़ात देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येऊ शकतो. बाधित गावांमध्ये आणि बाधित गावापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयावरील गाय आणि म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले, तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते. 
४.    आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लम्पी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.                                ५. निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून वेगळे बांधावे, गाई आणि म्हशी एकत्र बांधू नयेत, योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तत्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.
६.बाधित परिसरात स्वच्छता करावी आणि निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करता येईल.                    ७. रोगाचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठय़ात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करावी.    ८.प्रादुर्भावग्रस्त   भागात  तसेच  १० किमी. परिघातील जनावरांची वाहतूक बंदी ठेवावी.
   येथे साधा तातडीने संपर्क
    जनावरांमध्ये या आजाराचा संसर्ग     अत्यंत वेगाने होत असल्यामुळे रोगसदृश लक्षणे आढळल्यास जवळचे सरकारी, खासगी पशुवैद्यक, पशुवैद्यकीय संस्थांशी तातडीने संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तत्काळ संपर्क साधावा,
लेखन. रोहन विठ्ठल शिंदे,लेखक कृषी पदवीधर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here