जामखेड न्युज – – –
सध्या राज्यात राज्यसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना आता विधानपरिषद च्या 10 जागा साठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होत आहे. त्यात शिवसेनेकडून खुद्द उद्धव ठाकरे यांनी नंदुरबारच्या जिल्हा प्रमुख आमशा पाडवी या सामान्य कार्यकर्ते यांना विधानपरिषद साठी उमेदवारी जाहीर केली त्या मुळे महाराष्ट्र भर शिवसैनिकात सकारात्मक संदेश पोहोचला असून उत्साहाचे वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे.शिवसेनेत एकदीलाने संघटन कार्य करणाऱ्याला न्याय मिळतो अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवतात.
कोण आहेत आमशा पाडवी उद्धवजींनी का विश्वास टाकला
आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण 2019च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80 हजार 777 मते घेतली होती.
नंदुरबार मध्ये शिवसेना पाय रोवणार
नंदूरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून नंदूरबारमधून काँग्रेसची राज्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. त्यामुळे या जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडवी यांना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
जामखेड न्युजशी बोलताना आमशा पाडवी म्हणाले की,
मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकल्याचे समाधान मी शिवसेनेत सुरुवातीपासून काम करत आहे. त्याची आज कदर झाली. शिवसेना पक्षप्रमुखांनी मला तिकीट दिलं. हे माझं भाग्यच आहे. काल मला शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन आला. त्यांनी मला फोन करून याबाबतची काल माहिती दिली. आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांनीही मला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आज मी मुंबईत आलो आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं पाडवी यांनी सांगितलं.









