जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – ( सुदाम वराट )
भक्तीशक्ती बरोबरच लोकशक्ती आवश्यक असते व याच लोकशक्तीसाठी काम करायचे असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.या अत्यंत चांगल्या विचारांच्या कामाला महाराजांनी पावसाच्या रूपाने आशीर्वाद दिल्याचे देखील ते म्हणाले. कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांच्या रथ व रथोत्सवाच्या प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा व कर्जत बस आगाराचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.रोहित पवार म्हणाले, “यापूर्वी काय झाले हे पाहण्यापेक्षा आगामी काळात फक्त विकासाचे काम करायचे आहे. आगामी काळात एक हजार कोटींचे रस्ते होणार आहेत, तालुक्यात एमआयडीसी कोठे होणार हे एक दोन महिन्यात कळेल.आगामी काळात जातीपातीचे गटातटाचे राजकारण करायचे नाही तर फक्त विकासाचे राजकारण करायचे आहे.”

अधिकारी महत्वाचे असून त्यांना ताकद देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. असे सर्व समावेशक वक्तव्य करत विकासाचा मार्गच दाखवून दिला.असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्हिडीओद्वारे आगाराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे जाहीर करत यासाठी ५ कोटी मंजूर झाल्याचे म्हटले व आ. रोहित पवार यांचे कौतुक केले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही आ.पवार यांचे कौतुक करताना प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा ही त्याची जिद्दीमुळे व पाठपुराव्यामुळेच या आगाराला मंजुरी मिळाली असल्याचे म्हटले.