Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या कोल्हापूर होणार शंभर सेंकद स्तब्ध; लोकराजाला अनोखी मानवंदना

कोल्हापूर होणार शंभर सेंकद स्तब्ध; लोकराजाला अनोखी मानवंदना

0
260
जामखेड न्युज – – – 
लोकराजा राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त त्यांना शंभर सेकंद स्तब्ध राहून अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे. शुक्रवार दि.६ मे रोजी सकाळी दहा वाजता असाल तेथे शंभर सेकंद स्तब्ध राहण्याचे आवाहन राज्यातील जनतेला करण्यात आले आहे. दरम्यान,शाहूंना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह बहुसंख्य मंत्री व नेते शुक्रवारी कोल्हापुरात येणार आहेत. जिल्ह्यात शाहूंच्या कार्याचा जागर करण्यासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
६ मे १९२२ या दिवशी राजश्री शाहू महाराजांचे निधन झाले. त्या दिनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. ही स्तब्धता म्हणजे, राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार १०० सेकंद थांबून रस्त्यावर जिथे आहे तिथे दीड मिनिटे थांबून हे स्तब्धता रुपी वंदन प्रथमच साकारले जाणार आहे. या निमित्ताने शाहू महाराजांनी जे प्रचंड कार्य केले आहे, त्याचे स्मरण केले जाणार आहे. त्यांच्या या कार्याची स्मृती प्रत्येकाच्या मनात रुजावी हा यामागचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून गेले पाच दिवस जनतेला विविध मार्गाने आवाहन केले जात आहे.
शहरात आपत्कालीन सूचना देण्यासाठी ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्पीकर वरून बिगुल वाजवून पूर्वसूचना दिली जाणार आहे. या शिवाय सर्व उद्योग व्यवस्थापनातील सायरन, रुग्णवाहिका वरील सायरन १० वाजता एका वेळी वाजविले जाणार आहेत. जेणेकरून आता आपण स्तब्धता पाळायची आहे याची जाणीव नागरिकांना करू दिली जाणार आहे. स्तब्धतेसाठी सर्व वाहतुकीची १०० सेकंदासाठी थांबावी यासाठी चौकाचौकात स्वयंसेवक उभे राहणार आहेत. ते शिट्टी वाजवून स्तब्धता क्षणाची सर्व वाहनधारकांना जाणीव करून देणार आहेत.त्यामुळे सर्व वाहने आहे त्या जागी काही क्षण थांबणार आहेत.
रा. शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह अनेक मंत्री येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू मिल मध्ये सकाळी साडे दहा वाजता हे कार्यक्रम होणार आहेत. गेले आठ दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शाहू विचारांचे जागर सुरू आहे. प्रदर्शन, जत्रा, कुस्ती, संगीत कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.
३५० व्याख्यानाने झाला शाहू विचारांचा जागर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी तब्बल ३५० व्याख्यानांच्या माध्यमातून शाहूंचा विचार घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. तत्कालीन काळात त्यांनी समतेसाठी लढा दिला. त्यांच्या एकूणच सामाजिक, सर्वांगीण विचारांचा युवकांनी अंगिकार करावा, असे उद्गार ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी शिवाजी विद्यापीठात झालेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमातम काढले.
एकाच वेळी शहरात आणि जिल्ह्यात १०० ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. तथापि शाहू महाराजांच्या प्रेमापोटी तब्बल ३५० ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!