जामखेड न्युज – – – –
सध्या राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांत तापमान ४२ अंशाच्या वर गेलं आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पण, आता राज्यातील काही भागांत गडगडाटासह हलका पाऊस (Maharashtra Rain Alert) पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज वर्तविला आहे.
विदर्भात उष्णतेची लाट कायम -राजस्थानसह काही राज्यांमधील लाटसदृश्य वातावरणामुळे गेल्या २९ मार्चपासून विदर्भातील तापमान ४२ अंशावर गेलं असून उष्णतेची लाट आहे. तसेच आज २ एप्रिल आणि उद्या ३ एप्रिलला विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. अकोला, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोकांना उन्हाचे सर्वाधिक चटके जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडणं टाळावं. महत्वाचं काम असेल तर उन्हापासून स्वतःचा बचाव करून प्रवास करावा. तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होईल. अशा सूचना हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आल्या होत्या.
आज आणि उद्या, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. तसेच ५.६ एप्रिल रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता.