जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये अतिक्रमणामुळे दररोजचीच वाहतूक कोंडी
धुळ व खाचखळग्यामुळे वाहनधारक हैराण, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

तीन वर्षापासून शहरातील रखडलेला राष्ट्रीय महामार्ग तसेच दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे यामुळे शहरात दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील खाच खळगे व धुळ यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे व रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी होत आहे.

जामखेड शहरातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर रांग लागत असून वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे.

या कोंडीमागे रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम हे एक प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच चौक परिसरातील दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर मोटारसायकली व इतर वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अधिकच अरुंद होत आहे. परिणामी वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.

काही वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याने रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे.या समस्येवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जामखेड करांकडून होत आहे.

अठरा महिन्यांची मुदत असताना तीन वर्षे झाले तरी रस्ता होत नाही. राज्यातील सर्व अतिक्रमणे निघतात जामखेड शहरातील अतिक्रमणे का निघत नाहीत. राज्यात दोन वजनदार नेते असतानाही अतिक्रमण निघत नाही. रस्ता होत नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.




