जामखेड न्युज—–
स्त्रीजन्माचे स्वागत हीच खरी सामाजिक क्रांती-डॉ. सुधा कांकरिया
जामखेड येथे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध ) कायदा १९९४ कार्यशाळा संपन्न स्त्री जन्माची घटती संख्या समाज पोखरून टाकत आहे.ही धग शहरी भागापासून ग्रामीण पर्यंत पोहचली आहे.आपण वेळीच जागे झालो नाही तर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्त्रीविना,आईविना या जगाचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन लेक वाचवा अभियानाच्या प्रेणेत्या डॉ.सुधा कांकरिया यांनी केले.जामखेड ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस) प्रतिबंध कायदा १९९४ कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी विचार मंचावर वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोजकुमार शिंदे,गट विकास अधिकारी शुभग जाधव,नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोरडे,जिल्हा रुग्णालय पी.सी.पी.एन.डी.टी.समन्वयक ऍड.सारिका सुरासे,सरपंच वैजयंती पाटील,सामाजिक कार्यकर्ते जयेश कांबळे,स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,राहुल वासकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्या म्हंटल्या की;स्त्रीभ्रूणहत्येचे हे संकट इतके खोलवर रुजले आहे की त्याला भेदण्यासाठी स्त्रीजन्माच्या स्वागताचा विचार वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने समाजमनावर बिंबवणे गरजेचे आहे.मुलगाच हवा हा अट्टाहास,मुलीला दुय्यम वागणूक,महिलांमध्ये असणारी आर्थिक,सामाजीक,शारीरिक असुरक्षितता,हुंडा पद्धती,मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुंबाला कलंक आहे अशी भावना,गर्भलिंग निदानाची सहज व परवडण्याजोगी उपलब्धता, वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नैतिकता,महिलांचे बाजारीकरण,तिचे शोषण ही सामाजिक कीड आहे.

म्हणूनच या विरुद्ध वज्रमुठ उभी करण्याची गरज आहे.सामाजिक बदल आणि परिवर्तन घडवत स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी परिसर अभ्यास,ठराव आणि अंमलबजावणी,कन्या जन्म आनंद सोहळा,मुलींना शिकवा सशक्त बनवा,लाखोपती योजना,पतसंस्था सोसायटी बँकेचा सहभाग,फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे,मुलगीच आहे पणती दोन्ही घरी उजेड देती,नकोशी करूया हवीशी,आचरणातून संस्कार व युवा पिढीचा सहभाग,आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा,सामुदायिक डोहाळ जेवण,सोनोग्राफी मशीन शाप की वरदान,सामूहिक शपथ हा अकरा कलमी कृतिकार्यक्रम त्यांनी या कार्यशाळेत मांडला.संवेदनशील माणूस म्हणून स्त्रीभ्रूणहत्या टाळून सशक्त समाज बनवूया असेही त्या म्हणाल्या.

लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणेकरिता उपाययोजना काळाची गरज-डॉ.सुनील बोराडे
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे म्हणाले की;समाजमध्ये स्त्रीभ्रूणहत्या होणे हे कलंक आहे.स्वतःला प्रगत म्हणवला जाणाऱ्या समाजामध्ये हे स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढत आहे.गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याच्या जागृतीसाठी सर्व पातळीवर अधिक काम करण्याची गरज आहे.लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणेकरिता उपाययोजना ही काळाची गरज असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी जामखेड तालुक्याचा आरोग्य आढावा देखील मांडला.







