जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, नाम फाउंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या मदतीने मतदारसंघातील अनेक गावांत जलसंधारणाची भक्कम कामे पार पडली. ‘समृद्ध गाव घडवूया’ या अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढा खोलीकरण, चारी जोड प्रकल्प, खोल सलग समतल चर, नदी खोलीकरण, जुन्या बुजलेल्या पोट चाऱ्यांची दुरुस्ती, चाऱ्यांचे खोलीकरण आदी भागांमध्ये पहिल्याच पावसात गावे पाणीदार झाली आहेत.खोलीकरण केलेल्या अनेक चाऱ्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. अनेक भागात सध्या पहावयास मिळणारे हे चित्र समाधानकारक आहे.त्यामुळे कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न हळूहळू पण कायमचा सुटू लागला आहे.

जामखेड तालुक्यातील तेलंगशी, जवळके, सावरगाव आदी गावांमध्ये झालेले सलग समतल चरचे काम जिल्ह्यातील सर्वात लांब अंतराचे काम आहे. हा प्रकल्प ‘पाणी संवर्धनासाठी’ सर्वात परिणामकारक असेल यात शंका नाही कारण पहिल्याच पावसात या चाऱ्यांमध्ये सुमारे दिड कोटी लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा साठल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीचे दुर्भिक्ष निश्चितच कमी करण्यास आता मदत होणार आहे. अधिकाधिक लोकसहभाग, सामाजिक संस्थांची मदत घेत आमदार रोहित पवार करत असलेल्या जलसंधारण कामांमुळे कर्जत-जामखेडची समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे.इथल्या प्रत्येक गावातला शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रगत कसा होईल? यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे अनेक प्रयोग आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पार पडत आहेत.