जामखेड न्युज – – –
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात सादर केला. यावेळी त्यांनी राज्यात विकासाची पंचसूत्री राबविणार येणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कृषीक्षेत्र, कृषीसिंचन, पशुवैद्यकीय, पीक कर्ज अशा कृषीक्षेत्रांशी निगडीत बाबींसाठी अधिक तरतूद करण्यात आली.
यादरम्यान, भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच पीएम किसान योजनेत काही महत्वाचे बदल करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. पीएम किसान योजनेत जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करू असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांनी केलेल्या महत्वाचा घोषणा
> हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.
> शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
> जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा, शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
> पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
> येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करू अशी घोषणा देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
> कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.
> भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचंही यावेळी अजित पवार म्हणाले.
> शेततळ्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.
> जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
> देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार असल्याचं त्यांनी म्हटलं
> प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प
> या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार
> एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं
> मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी