जामखेड न्युज – – – –
दोन महिने उलटून गेले तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप (MSRTC Workers Strike) मिटला नाही. कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांना पगारही देण्यात आलेला नाही. संप काळात आणि त्यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचणेतून आत्महत्या केल्या आहेत. मात्र, पाथर्डी डेपोतील एका कंडक्टरने वेगळा पर्याय स्वीकारला आहे. सुमारे २४ वर्षे आधी तिकिटाचा ट्रे आणि आता मशीन घेऊन प्रवाशांना तिकिटे देण्याचे काम करणारे वाहक बाळासाहेब वायकर यांनी हातात तराजू घेऊन भाजी विक्री सुरू केली आहे.
ADVERTISEMENT 

एसटीच्या पाथर्डी डेपोतील वाहक बाळासाहेब वायकर गेल्या २४ वर्षांपासून एसटीत नोकरीला आहेत. तुटपुंज्या पगारावर आतापर्यंत त्यांची गुजराण सुरू होती. पैशाची गरज भागविण्यासाठी त्यांनी एसटी कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. आधी लॉकडाऊन आणि त्यानंतर सुरू झालेला संप यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली. त्यातच आईचे आजारपण, थकलेले घरभाडे आणि बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. अशाच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. राज्यात आणि नगर जिल्ह्यातही अशा आत्महत्या झाल्या.
मात्र, वायकर यांनी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी एका बचत गटात आहे. त्या बचत गटाकडून त्यांनी थोडे कर्ज घेतले आणि भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पाथर्डी शहरातील मंडईत ते भाजी विक्रीसाठी दुकान थाटून बसत आहेत. त्यांना ओळखणारे शहरात अनेक जण आहेत. वायकर यांना भाजी विकताना पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले, तर काहींनी सरकार आणि संघटनेच्या ताठर भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे आणि संप मिटावा, अशीच वायकर यांची भूमिका आहे. ‘गेली २४ वर्षे तुटपुंज्या पगारावर काम केले. मात्र आता कुटुंबाचे आर्थिक गणित जुळत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वायकर यांनी केली आहे.