जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि खातेदारांचे प्रलंबित राहिलेले फेरफार, वारस नोंदी, कलम१५५ प्रमाणे ७/१२ मधील दुरुस्ती वेळेवर पूर्ण व्हाव्यात आणि लोकांच्या तक्रारी येऊ नये यासाठी कर्जत जामखेड उपविभागामध्ये प्रत्येक महिन्याच्या ४ थ्या शुक्रवारी फेरफार अदालत प्रत्येक मंडळामध्ये घेण्याचे नियोजन महसूल विभागाने केलेले आहे.
यामध्ये प्रत्येक महिन्याच्या ४ थ्या शुक्रवारी ( त्या दिवशी सुट्टी असेल तर अगोदरच्या शुक्रवारी ) प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी फेरफार अदालत घेण्यात येत आहे. यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडेस प्रलंबित असणारे फेरफार निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे . त्यासाठी प्रत्येक मंडळाला एक नोडल अधिकारी देण्यात आलेला असून त्यांनी त्या दिवशी त्या मंडळामध्ये फेरफार अदालतीचे योग्य नियोजन होते किंवा नाही याचे पर्यवेक्षण करून काय कार्यवाही झाली आहे याचा अहवाल सदर करायचा आहे.
ADVERTISEMENT

ऑक्टोबर महिन्यामध्ये दिनांक २९/१०/२०२१ रोजी पहिली फेरफार अदालतघेण्यात आली होती. यामध्ये मंडलनिहाय जामखेड मंडळामध्ये २७, अरणगाव मंडळात १४, नायगाव मंडळात १२, नान्नज मंडळात २१, खर्डा मंडळात २९ असे एकूण ९३ फेरफार मंजूर करण्यात आले. तसेच ७/१२ मधील झालेल्या चुका ह्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार एकूण १६ दुरुस्त करण्यात आल्या.
नोव्हेंबर महिन्यामध्ये दिनांक २६/११/२०२१ रोजी दुसरी फेरफार अदालत घेण्यात आली आहे. यामध्ये मंडलनिहाय जामखेड मंडळामध्ये १५, अरणगाव मंडळात ७, नायगाव मंडळात ११, नान्नज मंडळात १३, खर्डा मंडळात १६ असे एकूण ६२ फेरफार मंजूर करण्यात आले. तसेच ७/१२ मधील झालेल्या चुका ह्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार एकूण १४ नोंदी दुरुस्त करण्यात आल्या.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण १५५ फेरफार मंजूर करण्यात आले असून कलम १५५ नुसार एकूण ३० नोंदी दुरुस्त करण्यात आलेल्या आहे. सदर फेरफार अदालतीस नागरिकांचा चांगला सहभाग मिळत आहे. फेरफार अद्लातीच्यावेळी त्या मंडळातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी हे मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहत असल्याने जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी आणि खातेदार यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.