जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
महाराष्ट्राच्या पावन भूमीत देशातील नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज उभारणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून आणि सहकार्यातून ‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ आज गुरुवारी कर्जत मधून करण्यात आला. यानिमित्ताने एक भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत अग्रभागी पारंपरिक नऊवारी साडीत सुवासिनी यात्रेसाठीचा भगवा ध्वज फडकवत होत्या. पारंपरिक धनगरी डफ स्वतः हातात घेऊन आ.रोहित पवार शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेतील मुलींचे लेझीम पथकाने सगळ्यांचे लक्ष वेधले. ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिरास वंदन करून शोभायात्रा पुढे शिवनेरी किल्ल्याकडे रवाना होणार आहे. शोभायात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी झाल्याने गर्दी दिसून आली.
लोकसभा-विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रवादीचे ‘दादा’ अर्थात अजित पवार यांनी प्रचारसभा व्यासपीठावर, मिरवणुकात भगवा ध्वज लावण्याची संकल्पना घोषित केली होती. पक्षात त्यावर मत-मतांतरे दिसून आली. अनेक सभात भगवा ध्वज फडकवण्यात आला. पण भगवा ध्वजा वरून पक्ष प्रमुख मोठ्या साहेबांनी आपले वेगळे मत व्यक्त केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व धर्म,पंथ,गट सगळ्यांना सोबत घेत समाजकारण-राजकारण करणारा पक्ष असल्याने भगवे वादळ हे जनते पेक्षा पक्षांतर्गत घोंगावले आणि शांत झाले. आता अजितदादां नंतर साहेबांचे नातू आणि दादांचे पुतणे असलेल्या कर्जत-जामखेडचे आ.रोहित पवार यांनी भगवा ध्वजाची संकल्पना नव्या रुपात मांडून त्यास ऐतिहासिक आणि धार्मिक जोड देत भगव्याला पुन्हा पक्षाच्या भूमीवर घेतले आहे.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी निजामाविरुद्ध हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावन भूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याचा भुईकोट किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर प्रेरणा, ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचाच अभिमान, सर्वस्व आणि स्फूर्तिस्थान आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुध्दांना उद्देशून ‘भगवा’ शब्द आला आहे. सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाने खांद्यावर जी पताका घेतली तीही भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली. शीख धर्मामध्ये त्यागाचे आणि चैतन्याचे प्रतिक आहे भगवा रंग, पगडीचा सर्वसामान्य रंगही भगवाच, पिवळ्या रंगाची सावली जिला बसंती म्हणतात ती भगव्याचीच छटा आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट असून वजन ९० किलो आहे. हा राज्यातीलच नाही तर जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर (१५ ऑक्टोबर) या स्वराज्य ध्वजा ची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला(उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी ६ राज्यांमधून १२ हजार किलोमीटर असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. निरंतर बदलते जग आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव या सर्वांमध्ये आपल्या परंपरा जपून त्यांना पुढे नेण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाचा प्रारंभ ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता कर्जत येथील संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरातील पूजेने होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर नेऊन तिथंही पूजा केली जाईल.
“महाराष्ट्राला भव्य ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वैभवशाली परंपरा लाभली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खर्डा किल्ल्याच्या या भूमीला संवर्धित करून आपल्या इतिहासाची माहिती आणि ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीतून आपल्या परंपरेला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लोकसहभागातून हा प्रयत्न केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत या ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीसाठी आपला सर्वांचा सहभाग आणि लाभलेले सहकार्य यासाठी मी आपला आभारी आहे.”
-आमदार रोहित पवार









