जामखेड न्युज – – –
अटक नाट्यानंतर नारायण राणे यांनी दोन दिवस आराम केल्यानंतर आजपासून रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. राणे यांनी आज यात्रेच्या पहिल्याच दिवशी आंबा-काजू बागायतदारांशी संवाद साधला. राणे सुमारे दहा मिनिटे बोलले. पण या दहा मिनिटात त्यांनी शिवसेनेवर अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज रत्नागरीतून पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. यावेळी त्यांनी आंबा, काजू बागायतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काजू- आंबा बागायतदारांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. तसेच त्यांनी जन आशीर्वाद यात्रेचं महत्त्व समजून सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात आणलेल्या योजनांची माहितीही दिली. यावेली आंबा-काजू बागायतदार संघाकडून राणेंचा गोळप गावी सत्कार करण्यात आला.
एकालाही आत्महत्या करू देणार नाही
तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी मी रत्नागिरीला आलो आहे. मी एवढंच सांगेल तुमचे निवेदन मला मिळाले आहे. याचा पुरेपुर अभ्यास करुन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. एक बागायतदार मला आत्महत्या करेल असं म्हणाला. मात्र मी कुणाही व्यक्तीला आत्महत्या करू देणार नाही. मी एका महिन्याच्या आत अधिकाऱ्यांना घेवून येईल आणि तुमचे प्रश्न सोडवणार, अशी ग्वाही राणेंनी दिली. मात्र, या दहा मिनिटाच्या भाषणात राणे यांनी शिवसेनेवर किंवा राज्य सरकारवर टीका केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तीन दिवस कोकणात
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील योद्धा पुन्हा मैदानात, असं लिहिलं आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. यापाठीमागील ठोस कारण आणखी समजू शकलेलं नाही.






