Tuesday, May 5, 2026
Home ताज्या बातम्या दोन दिवसांवर मुलीचे लग्न बस्ता बांधून घरी जात असलेल्या वडीलांवर काळाचा घाला,...

दोन दिवसांवर मुलीचे लग्न बस्ता बांधून घरी जात असलेल्या वडीलांवर काळाचा घाला, खर्डा परिसरातील घटनेमुळे एकच खळबळ

0
2

जामखेड न्युज ——–

दोन दिवसांवर मुलीचे लग्न बस्ता बांधून घरी जात असलेल्या वडीलांवर काळाचा घाला, खर्डा परिसरातील घटनेमुळे एकच खळबळ

मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना आणि आनंदाचे वातावरण असतानाच काळाने घाला घातला आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथून मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधून दुचाकीवरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत एका पित्याचा जागीच मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही हृदयद्रावक घटना खर्डा गावापासून एक किलोमीटर अंतरावर घडली. महादेव लक्ष्मण फरताडे (वय 45, रा. गोसावीवाडी, ता.परंडा,जि. धाराशिव) असे मृताचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार,महादेव लक्ष्मण फरताडे यांच्या मुलीचे लग्न 7 मे 2026 रोजी निश्चित झाले होते. लग्नासाठी कपड्यांचा बस्ता बांधण्यासाठी ते खर्डा येथे आले होते.बस्ता बांधून झाल्यानंतर ते आपल्या बजाज प्लेटिना मोटारसायकलने (क्र. MH-25-4923) नातेवाईक अभिषेक चव्हाण यांच्यासह भूममार्गे गावाकडे निघाले होते.

खर्डा गावापासून काही अंतरावर आले असताना, समोरून येणाऱ्या एका अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MH-16-8982) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत भरधाव वेगात चालवली.या भरधाव दुचाकीने फरताडे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,महादेव फरताडे हे हवेत उंच उडून थेट रस्त्यावर डोक्यावर आदळले.गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात करून आरोपी फरार
धडक दिल्यानंतर अज्ञात आरोपी चालक घटनास्थळावरून तातडीने फरार झाला.याप्रकरणी अभिषेक चव्हाण (वय 18, रा. वंजारवाडी, ता.जि.बीड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस कारवाई ठाणे अंमलदार आर.डी.नागरगोजे यांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106(1), 281(A), 125(B) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम 134 व 130(A)B अन्वये अज्ञात चालकावर गुन्हा (रजि. नं. 65/2026) दाखल केला आहे.खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी शेंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

गावावर शोककळा अवघ्या दोन दिवसांवर मुलीचे लग्न आले असताना,वडिलांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने फरताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कपड्यांचा बस्ता घेऊन घरी परतणाऱ्या वडिलांचा मृतदेह घरी पोहोचल्याने संपूर्ण गोसावीवाडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!