जामखेड न्युज – – – –
गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसपासून सुटका मिळवण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. भारतातही या कोरोना प्रतिबंधक लसीकरन मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. त्यातच आता तर महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे. राज्यात एकूण डोसेसच्या संख्येने ५ कोटींचा टप्पा पार केला असून उत्तर प्रदेश पाठोपाठ देशात महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.
महाराष्ट्राने आतापर्यंत ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. काल म्हणजे १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. ६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
ADVERTISEMENT

तर देशानेही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. ‘लसीकरणाच्या बाबतीत भारताने विक्रमी प्रगती केली असून आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींच्या ५५ कोटी मात्रा दिल्या आहेत. करोना विरोधातील भारताचा लढा बळकट करा. लसीकरण करून घ्या!’, असे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केले.
१० कोटींचे लसीकरण पूर्ण करण्यास भारताला ८५ दिवस लागले. २० कोटींच्या लसीकरणासाठी यानंतर ४५ दिवस, ३० कोटींसाठी आणखी २९ दिवस, ४० कोटींचा आकडा पार करण्यास आणखी २४ दिवस लागले. ५० कोटी लसीकरण त्यानंतर २० दिवसांनी, म्हणजे ६ ऑगस्टला पूर्ण झाले. १४ ऑगस्टला हा आकडा ५४ कोटींपलीकडे गेला.
दरम्यान, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सर्व स्रोतांच्या माध्यमातून करोना प्रतिबंधक लशींच्या ५६.८१ कोटीहून अधिक मात्रा पुरवण्यात आल्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. यापैकी वाया गेलेल्या मात्रा मिळून एकूण ५४,२२,७५,७२३ लसमात्रांचा वापर झाला आहे.






