जामखेड न्युज – – –
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपले. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसला. अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे._
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार
भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागानं मराठवाडा विभागात पावसाचा जोर वाढणार असं म्हटलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं पावसाच्या सरी कोसळल्यास शेतकऱ्यांची पिक वाचतील, असं हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सांगितलं आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
17 ऑगस्टला बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अॅलर्ट’
हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस
कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलाय. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.