जामखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार, पीके पाण्यात, रस्ते उखडले
जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एका दिवसात तालुक्यातील सातही मंडळात 70 ते 80 मिमी पावसाची नोंद होत आहे. सातही मंडळात सरासरी शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कांदा लागवड नुकतीच केलेल्या कांदा पीकात तळे साचले आहे. तर सोयाबीन पीके काढणीस आलेली आहेत मात्र आता ती पाण्यात आहेत. दररोजच पाऊस येत आहे. कधी पाऊस उघडणार पाणी कधी ओसरणार यात मोठ्या प्रमाणावर पीके पाण्यात सडून जाणार आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील अनेक पुलावरून पाणी गेल्याने पुल खचले आहेत. रस्ते उखडले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहरी तलावाचा सांडवा फुटला होता.
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून नागरिक जखमी झाले आहेत. तर पशूधनही मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे.
पीके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस दररोजच येत आहे. शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेते खणून गेले आहेत. पीके पाण्यात शेतात तळे यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
चौकट सध्या अनेक ओढे, नदी यांनी पात्र सोडून बाहेर येत आहे यास आपणच जबाबदार आहोत. कारण प्रत्येक ठिकाणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत नदी पात्र लहान झाले आहेत. तसेच नदी पात्रात झाडे झुडपे तसेच पाण्याला अडथळा होईल अनेक अडथळे आहेत. टाकाऊ वस्तू व फाटके निरूपयोगी कपडे नदीत टाकले जातात. यामुळे पाणी पात्रात पाणी बसत नाही. नदी, ओढे यातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे आवश्यक आहे.