गावात तीव्र पाणीटंचाई असताना जलजीवन च्या विहिरीचे पाणी सरपंचांच्या शेतीला, पाणीपुरवठा विहिरीच्या शेजारी पन्नास फुटावर शासकीय योजनेतून सरपंचाची दुसरी विहीर जामखेड तालुक्यातील प्रकार
गावात तीव्र पाणीटंचाई असताना जलजीवन च्या विहिरीचे पाणी सरपंचांच्या शेतीला,
पाणीपुरवठा विहिरीच्या शेजारी पन्नास फुटावर शासकीय योजनेतून सरपंचाची दुसरी विहीर जामखेड तालुक्यातील प्रकार
जामखेड तालुक्यात जलजीवन कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आहेत. यातच पोतेवाडी येथे अजब प्रकार उघडकीस आला आहे. गावात तीव्र पाणी टंचाई असतानाही पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर तीन विद्युत मोटारीच्या साहाय्याने सरपंचाच्या शेतीला पाणीपुरवठा होत आहे. शेती हिरवीगार तर गावात तीव्र पाणी टंचाई आहे. यात विशेष भर म्हणजे जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या जवळच मनरेगा योजनेअंतर्गत स्वत: च्या विहिरीचे काम सुरू आहे तेही अगदी पाणीपुरवठा योजनेच्या पन्नास फूट अंतरावरच विहिरीचे काम सुरू आहे.
तालुक्यातील पोतेवाडी येथे जलजीवन कामामध्ये मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ आहे. गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रूपयांच्या निधीतून पाणीपुरवठ्यासाठी नान्नज हद्दीत विहीर व तेथून पाईपलाईन करण्यात आली. अद्याप हस्तांतरण बाकी आहे. सध्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे. काही ठिकाणी खाजगी टँकर आहेत. पाणी टंचाई असताना सरपंच प्रविण शिवाजी पोते यांनी पाणीपुरवठा विहिरीतून स्वत:च्या शेतातील पिकाला पाणी सुरू आहे. तसेच या विहिरीच्या पन्नास फूट अंतरावर स्वत:च्या शासकीय योजनेतून घेतलेल्या विहिरीचे काम सुरू आहे. शासकीय योजनेतून मिळालेली विहिर इतक्या जवळ कशी मंजुरी दिली याकडे अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
याबाबत गावातील गणेश (बंडू) नामदेव सगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंच प्रविण शिवाजी पोते यांनी अधिकाराचा गैरवापर करून गैरवर्तन केल्याने सदस्यत्व व पद रद्द करण्यात यावे असे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सरपंच प्रविण शिवाजी पोते यांनी गावास पाणी पुरवठा करण्यासाठी नुकत्याच आलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाईपलाईनचे पाणीमुख्य पाईपलाईनला जोडून स्वतःचे शेती बागायत करणेसाठी स्वतःच्या शेततळयामध्ये टाकुन गैरवापर करत आहेत. यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.
शासकीय जलजीवन मिशन अंतर्गत विहीरीच्या जवळ अनुदान घेऊन 50 फुट अंतरावर स्वतःची विहीर खोदली असून संबंधित विहीरीची व संपुर्ण जलजीवनमिशन योजनेची चौकशी करावी. सरपंच प्रविण शिवाजी पोते यांनी आपले पदाचा गैरवापर करून गैरवर्तन केले आहे. म्हणुन ते ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 नुसार चौकशी करून अपात्र ठरतात.
चौकट शासकीय योजनेतून विहीसाठीचे नियम अधिकारी वर्गाला हाताशी धरून धाब्यावर बसवून पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीच्या पन्नास फूट अंतरावर विहीर कशी मंजूर झाली. तसेच गावात पाणीटंचाई असताना या विहिरीचे पाणी स्वत च्या शेतात. याचबरोबर मुख्य पाईपलाईन स्वत ची पाईपलाईन जोडून या विहिरीचे पाणी स्वत च्या शेततळ्यात असा सगळा प्रकार आहे.