जामखेड न्युज——
चारचाकी वाहन विहिरीत पडल्याने चार जणांचा मृत्यू, जामखेड परिसरात एकच खळबळ

जामखेड नगरपरिषद हद्दीतील, जांबवाडी जवळील मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज बुधवार दि. १५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण चाकी बोलेरो गाडीने जामखेड कडे येत असताना जांबवाडी शिवारात रस्त्यालगत असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पन्नास फूट खोल विहिरीत बोलेरो गाडी पडली. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले. त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले.
जामखेड येथील अशोक विठ्ठल शेळके वय 29 रा. जांबवाडी, रामहरी गंगाधर शेळके वय 35 रा. जांबवाडी, किशोर मोहन पवार वय 30 रा. जांबवाडी, चक्रपाणी सुनील बारस्कर वय वय 25 रा. राळेभात वस्ती असे चार तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पवनचक्की कंपनीची ची बोलेरो गाडी एम एच. 23 ए. यु. 8485
पडल्याने एकच मोठा आवाज झाला यामुळे जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरू असल्याने तेथील मजूर घटनास्थळी धावले, व चारही तरूणांना बाहेर काढले आणि ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तत्पुर्वीच चौघांचाही मृत्यू झाला होता. अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, नंदकुमार सोनवलकर, उपनिरीक्षक गांगर्डे, संजय लोखंडे, जितेंद्र सरोदे, रवी वाघ, देवा पळसे. सचिन पिरगळ यांनी पंचनामा केला.
चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता. पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात काम सुरू आहे.