जामखेड न्युज – – – –
महाडमध्ये काही दिवसांपूर्वी तळीये गावात दरड कोसळली. या दुर्घटनेत अनेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची केंद्र सरकारकडूनही दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी 2.15 मिनिटांनी भेट दिली. त्यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली. गावकऱ्यांचा सांत्वन केलं. तसेच त्यांनी गावकऱ्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला.
*मुख्यमंत्री काय म्हणाले?*
तुमच्यावर मोठा प्रसंग कोसळलेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकी इतर गोष्टी या सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करु. सरकारकडून सर्वांना मदत दिली जाईल. असं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनिल तटकरेही उपस्थित होते.
*सुरक्षितस्थळी पुनर्वसन करणार*
दरम्यान यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तळीये ग्रामस्थाना सुरक्षित ठिकाणी हलवणार असल्याची माहिती दिली. “तळीयेसारख्या डोंगरउतारावर असलेल्या गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल”, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
*49 मृतदेह बाहेर काढले, आणखी माणसे ढिगाऱ्याखाली*
दरडीखालून 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाड तालुक्यात तळीये 38, पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी इथे 5, तर पोलादपूर तालुक्यातच केवनाळे इथे 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच या दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 35 महिला, 10 मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसेच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे.